सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ला मोठा झटका! थेट कमाईवर होणार परिणाम

सनी देओलच्या 'बॉर्डर 2' या चित्रपटाला भारतात U/A सर्टिफिकेट मिळालं आहे. असं असलं तरी या चित्रपटाला दुसऱ्या एका गोष्टीमुळे मोठा झटका मिळाला आहे. यामुळे थेट चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होणार आहे. नेमकं काय घडलं, ते सविस्तर वाचा..

सनी देओलच्या बॉर्डर 2ला मोठा झटका! थेट कमाईवर होणार परिणाम
Sunny Deol
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 23, 2026 | 9:22 AM

अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट आज (शुक्रवार, 23 जानेवारी) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दोन दिवस आधी बुधवारी सेन्सॉर बोर्डाने याला U/A 13+ सर्टिफिकेट दिला. परंतु तरीही या चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम होणार आहे. यामागचं कारण म्हणजे ‘बॉर्डर 2’ला अद्याप आखाती देशांमध्ये प्रदर्शनासाठी मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ला जसा आर्थिक फटका बसला, तसाच आता सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’लाही बसण्याची शक्यता आहे. रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’वर आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती.

‘धुरंधर’ या चित्रपटाच्या ओव्हरसीज डिस्ट्रीब्युटर प्रणव कपाडियाने सांगितलं होतं की, आखाती देशांमध्ये चित्रपटावर बंदी घातल्याने त्यांचं जवळपास एक कोटी डॉलरचं नुकसान झालं होतं. असं असलं तरी ‘धुरंधर’ हा भारतात आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. ‘बॉर्डर 2’लाही आखाती देशांमध्ये अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. कारण सर्वसाधारणपणे पाकिस्तानविरोधी भावना असलेल्या भारतीय चित्रपटांना तिथे प्रदर्शनाची परवानगी मिळत नाही. ‘बॉर्डर 2’ला अद्याप बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातीत क्लिअरन्स मिळालेला नाही.

‘बॉर्डर 2’ या चित्रपटाची कथा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. जे. पी. दत्ता यांच्या 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. भारतात सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील कोणत्याच सीन किंवा डायलॉगवर कात्री चालवली नाही. U/S 13+ सर्टिफिकेटवरून हे स्पष्ट होतंय की या चित्रपटात फारशी हिंसक दृश्ये नाहीत. परंतु सेन्सॉर बोर्डाने यात काही लहानसहान बदल मात्र सुचवले आहेत. लढाऊ विमानांवरील भारतीय तिरंग्याला हटवण्याची सूचना देण्यात आली आहे. तर आणखी एका युद्धनौकेचं नाव ‘कवच’ असं बदलण्यात आलं आहे.

या सीक्वेलमध्ये सनी देओल शीख व्यक्तीरेखेत आहे. तर दिलजितची भूमिका भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर आणि परमवीर चक्र विजेते निर्मलजीत सिंग सेखों यांच्यावर आधारित आहे. वरुण धवनची भूमिका भारतीय लष्कराचे परमवीर चक्र विजेते कर्नल होशियार सिंग दहिया यांच्यापासून प्रेरित आहे. जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ हा चित्रपट 1971 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान लोंगेवाला पोस्टवर झालेल्या लढाईवर आधारित होता.