Sai Pallavi: साई पल्लवी वादाच्या भोवऱ्यात; काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दल विधान केल्यानंतर तक्रार दाखल

| Updated on: Jun 17, 2022 | 9:42 AM

गाईंची तस्करी आणि काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दल (Kashmiri Pandit exodus) विधान केल्याने बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

Sai Pallavi: साई पल्लवी वादाच्या भोवऱ्यात; काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दल विधान केल्यानंतर तक्रार दाखल
Sai Pallavi
Image Credit source: Facebook
Follow us on

प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री साई पल्लवीविरोधात (Sai Pallavi) हैदराबादमधील सुलतान बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गाईंची तस्करी आणि काश्मिरी पंडितांच्या हत्येबद्दल (Kashmiri Pandit exodus) विधान केल्याने बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. साईचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि कायदेशीर अभिप्राय घेतल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. साईने नुकतीच एक मुलाखत दिली होती आणि तिच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या मुलाखतीत साईने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवलेला काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि गाईंची तस्करी केल्याने मुस्लीम चालकाची केलेली हत्या या दोन्ही गोष्टी चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे. तिने व्यक्त केलेल्या या मतावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“मला लहानपणापासूनच हे शिकवलं गेलंय की तू चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न कर. कोणी लहान, कोणी मोठा असं काही नसतं. अशाच वातावरणात मी लहानाची मोठी झाले. डावे आणि उजवे यांच्याविषयी मी फार ऐकलंय, पण यात कोण बरोबर आणि कोण चुकीचं हे सांगता येणार नाही. द काश्मीर फाईल्स या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादाबद्दल बोलायचं झाल्यास, गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लीम चालकाला मारण्यात आलं आणि त्यावेळी जय श्री रामच्या घोषणा दिल्या गेल्या. मग तेव्हा जे घडलं आणि आता जे घडतंय त्यात काय फरक आहे?”, असं ती या मुलाखतीत म्हणाली.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि गाईंच्या तस्करीबद्दल केलेली हत्या या दोन गोष्टी एकच असल्याचं म्हटल्याने नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ट्विटरवर तिच्या या मुलाखतीवरून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. साई नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि परखड भूमिका घेण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे या वादावर तिची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.