Deool Band 2: अखेर ‘देऊळ बंद 2’ने उमटवली 100 कोटी रुपयांवर मोहोर; प्रवीण तरडेंची मोठी घोषणा
Deool Band 2: 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने अखेर कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. प्रवीण तरडे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. प्रदर्शनाच्या 39 दिवसांत या चित्रपटाने हा टप्पा गाठला आहे.

प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम रचला आहे. या चित्रपटाने अवघ्या 39 दिवसांत कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. त्याचसोबत त्यांनी मोठी घोषणासुद्धा केली आहे. 21 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून आजपर्यंत थिएटरमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. 39 व्या दिवसाचा शेवटचा शोसुद्धा जवळपास हाऊसफुल होता. पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत सर्व खुर्च्या बुक झाल्या होत्या. अवघ्या आठ ते दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटानंतर आता ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपटसुद्धा 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत प्रवीण तरडे म्हणाले, “39 व्या दिवसाचा आज शेवटचा शो.. हाच तो प्रेक्षक ज्याने शंभर कोटींवर शेवटची मोहोर उमटवली आहे. आजपासूनच मराठवाडा, खान्देश इथून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या 200 मुलींना दोन्ही वेळचा मेसचा डबा मोफत दिला जाणार आहे. चित्रपटातून मिळणारा नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्याची मूळ संकल्पना जयश्री वाणी आणि जुईली वाणी यांची होती. या निधीतून त्या मुलींच्या शिक्षणाचा, दोन वेळच्या जेवणाचा आणि वाचनालयाच्या सुविधेसाठीचा खर्च उचलला जाणार आहे.” प्रवीण तरडे यांच्या या कार्याचं नेटकऱ्यांकडून विशेष कौतुक होत आहे.
प्रवीण तरडे यांचा व्हिडीओ-
View this post on Instagram
शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, त्यांना मिळणारं सुमार दर्जाचं बी-बियाणं, बनावट खतं, कीटकनाशकं, सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा छळ या सगळ्या वास्तवाची मांडणी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटात करण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण तरडेंची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडेनं महिला शेतकरीची मुख्य भूमिका साकारली आहे. तिचा नवरा, सासू हे स्वामीभक्त असतात, ती मात्र नास्तिक आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी खूप कष्ट करायची तिची तयारी आहे. तर दिग्गज अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहेत.
