काय म्हणतोय डोनाल्ड ट्रम्प? स्वामींचा राघव शास्त्रीला अमेरिकेत फोन; गश्मीरच्या धमाकेदार एण्ट्रीसोबत ‘देऊळ बंद 3’ची घोषणा
'देऊळ बंद 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यामधील एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेता गश्मीर महाजनीने या चित्रपटात राघव शास्त्री म्हणून दमदार एण्ट्री केली आहे. अमेरिकेत काम करणाऱ्या राघवला स्वामींचा फोन येतो अन्..

तब्बल 11 वर्षांनंतर प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 21 मे रोजी गुरुवारी ‘देऊळ बंद 2’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये प्रवीण तरडे यांची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत आहे. तर 2015 मध्ये अभिनेता गश्मीर महाजनी याने राघव शास्त्रीची मुख्य भूमिका साकारली होती. पहिल्या भागात स्वामी समर्थांची भूमिका साकारलेले अभिनेते मोहन जोशी आता दुसऱ्या भागातही स्वामींच्याच भूमिकेत परतले आहेत. ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉक्स ऑफिसवर मोठा गाजावाजा केला होता. श्रद्धा विरुद्ध विज्ञान यांचा संगम असलेल्या या चित्रपटाने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आता दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे या भागात राघव शास्त्रीचीही दमदार एण्ट्री झाली आहे.
सोशल मीडियावर चित्रपटातील एक क्लिप पहायला मिळतेय, ज्यामध्ये गश्मीर महाजनी पुन्हा एकदा राघव शास्त्रीच्या भूमिकेत परतला आहे. यावेळी तो अमेरिकेत आहे आणि तिथे त्याला चक्क स्वामींचा फोन येतो. “मी अक्कलकोटहून स्वामी समर्थ बोलतोय, तुला मी आठवतोय का”, असा सवाल ऐकताच तो थक्क होतो. ‘ओह माय गॉड’ असे उद्गार त्याच्या तोंडून निघतात तेव्हा स्वामी म्हणतात, “येस माय डार्लिंग, आय एम युअर गॉडच. काय म्हणतेय तुझी अमेरिका, काय म्हणतोय तुझा डोनाल्ड ट्रम्प?” यानंतर राघव शास्त्री आणि स्वामी समर्थ यांच्यातील संवाद पुढे चालू राहतो. राघव शास्त्रीच्या या एण्ट्रीसोबतच ‘देऊळ बंद 3’चीही घोषणा करण्यात आली आहे.
View this post on Instagram
‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या सर्वांची जबाबदारी प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच सांभाळली आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी लेखनशैलीमुळे हा चित्रपट अधिक प्रभावी ठरला आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या दैवी भूमिकेत झळकले असून, त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. त्यांच्या प्रभावी संवादफेकीतून आणि भावनिक अभिनयातून श्रद्धेची ताकद प्रभावीपणे प्रकट होताना दिसते.
‘देऊळ बंद 2’मध्ये शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीतील ज्वलंत समस्या, त्यांच्या समोरील आर्थिक संकट आणि शेतकरी आत्महत्या यांसारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आलं आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अध्यात्म यांमधील संघर्षासोबतच देवाचं अस्तित्व आणि सामाजिक उत्तरदायित्व यांविषयीची मांडणी यात अत्यंत प्रभावीपणे करण्यात आली आहे.
