
प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञाताकडून झालेल्या गोळीबार प्रकरणात अनेक धागेदोरे सापडत आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली असून बिष्णोईचा हस्तक शुभम लोणकर याने भाजप आणि काँग्रेस आमदारांना दिलेल्या धमक्यांचीही सरकारने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणात एनआयएने अनमोल बिष्णोईला अटक केली असून चौकशीसाठी त्याला मुंबईत आणण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. मुंबईतील हत्या, गोळीबार आणि धमक्यांच्या प्रकरणांमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई वाँटेड आहे. त्याला चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात द्यावं, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. विधान परिषदेत रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मुंबईत पुन्हा एकदा गँगवॉरचा धोका निर्माण झाल्याचा आरोप यावेळी सदस्यांनी केला. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी सांगितलं की, मुंबई पोलीस सर्व प्रकरणांचा गांभीर्याने तपास करत आहे.
“मुंबईत अनेक प्रकरणांमध्ये अनमोल बिष्णोई वाँटेड आहे. त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. आमची विनंती मान्य केली जाईल अशी आशा आहे. रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे मुंबईतील चित्रपट कलाकारांनी घाबरून जाऊ नये”, असं आवाहन फडणवीसांनी यावेळी केलं. त्याचप्रमाणे विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्यांनी सांगितलं की, या घटनेतील आरोप शुभम लोणकर असून तो बिष्णोई गँगसाठी काम करतो. त्याच्या भावाला आधीच अटक करण्यात आली असून देशबाहेर असलेल्या शुभमलाही लवकरच अटक केली जाईल.
मुंबईत सेलिब्रिटींना पद्धतशीरपणे लक्ष्य केलं जात असल्याच्या आणि त्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेल्या भीतीबाबत शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी आश्वासन दिलं, “मी कलाकारांना आवाहन करतो की त्यांनी घाबरू नये. आम्ही मुंबईत गँगवॉर वाढू देणार नाही. सेलिब्रिटींना आवश्यक ती सुरक्षा पुरवली जात आहे.”
फडणवीसांनी विधान परिषदेत असंही सांगितलं की, “शुभम लोणकर हा महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने यापूर्वी काँग्रेसच्या एका आमदाराला आणि आता भाजपच्या एका आमदाराला धमकी दिली आहे. परदेशात फोन करून लोकांना धमक्या देणं ही त्याची कार्यपद्धती आहे. आम्ही त्याला कधीतरी नक्कीच अटक करू. एनआयएनं अनमोल बिष्णोईला अटक केली असून आम्ही त्याच्या कोठडीची मागणी केली आहे. ती आम्हाला मिळेल अशी आशा आहे. एनआयएची कोठडी संपताच आम्हाला त्याचा ताबा मिळेल. कारण मुंबईतील अनेक प्रकरणांमध्ये तो वाँटेड आहे.”