घृणास्पद, द्वेष अन् हिंसा..; ‘धुरंधर’वर ‘धडक 2’च्या दिग्दर्शिकेनं साधला निशाणा
'धडक 2' या चित्रपटाची दिग्दर्शिका शाजिया इक्बालने 'धुरंधर' या चित्रपटाबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने रणवीर सिंहच्या या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे. अनर्थाला प्रोत्साहन देणारा हा चित्रपट असल्याचं तिने म्हटलंय.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. काहींना हा चित्रपट खूप आवडला तर काहींनी त्यावर प्रचारकी असल्याची टीका केली. आता ‘धडक 2’ या चित्रपटाची दिग्दर्शिका शाजिया इक्बालने त्यावर सडकून टीका केली आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट ‘भयानक’ असल्याचं तिने म्हटलंय. शाजियाने ‘धुरंधर’वर द्वेष आणि हिंसा भडकावण्याचाही आरोप केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने काही पोस्ट लिहित आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. परंतु जेव्हा तिची ही पोस्ट व्हायरल झाली, तेव्हा तिने तिचं अकाऊंट प्रायव्हेट केलं. शाजियाने इन्स्टा स्टोरीमध्ये ‘धुरंधर’चं नाव न लिहिता त्याविषयी दोन पोस्ट लिहिल्या आहेत.
या पोस्टमध्ये तिने म्हटलंय, ‘हा किती भयानक चित्रपट आहे. हे रहस्य नाही किंवा तो नकळतपणे बनवलेला नाही. द्वेष पसरवणं आणि हिंसाचार भडकावणं हा या चित्रपटाच्या डीएनएमध्येच आहे. पण हा एक चांगला बनवलेला चित्रपट आहे. पार्श्वसंगीतदेखील छान आहे. इंडस्ट्रीतील मित्रांनो, तुम्ही खूप छान काम केलं आहे. शाब्बास. तुमच्यापैकी बहुतेकांना तुमचा मोठा निष्काळजीपणा लपवण्यासाठी अल्पसंख्याकांची पर्वा नाही ही चांगली गोष्ट आहे.’ या दोन्ही पोस्टमध्ये तिने ‘धुरंधर’चा उल्लेख केला नव्हता. परंतु आणखी एका पोस्टमध्ये तिने चित्रपटाचं नाव स्पष्टपणे नमूद केलं होतं. त्यात तिने लिहिलं, ‘किती लोकं आणि याद्या हेच म्हणतंय की धडक 2 आणि धुरंधर हे एकाच प्रकारचे चित्रपट आहेत. लोकांना सिजोफ्रेनिया झालाय का? किंवा खरंच लोकांमध्ये खूप प्रतिभा असते आणि आपण खूप कडक आहोत?’
शाजिया इक्बालची पोस्ट-

शाजियाने विपुल शाहच्या ‘द केरळ स्टोरी 2’ या आगामी चित्रपटाच्या टीझरवरही टीका केली आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये हा टीझर शेअर करत तिने बॅकग्राऊंडमध्ये ‘स्वदेस’ चित्रपटातील ‘ये जो देश है मेरा’ हे गाणं जोडलंय. त्यावर तिने लिहिलं, ‘..आणि त्यानंतर हा द केरळ स्टोरी 2 चा टीझर.’ या पोस्टनंतर शाजियाने तिचं अकाऊंट प्रायव्हेट केलं आहे.
रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भारतात 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 1300 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत.
