विद्यार्थी आंदोलनावर दिलजीत दोसांझची अखेर प्रतिक्रिया, सांगितलं इतके दिवस गप्प राहण्याचं कारण
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सुरु असलेल्या CJP च्या आंदोलनावर दिलजीत दोसांझने प्रतिक्रिया का दिली नाही? दिलजीतने केला मोठा खुलासा

अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझने दीर्घकाळ मौन बाळगल्यानंतर अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोशल मीडियावरील एका सविस्तर पोस्टद्वारे त्याने सरकार आणि प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या मागण्या शांततेने ऐकून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आवाहन केले. तसेच, यापूर्वी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे स्वतःला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचेही त्याने सांगितले.
यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत विचारणा झाल्यावर दिलजीतने ‘मी कलाकार आहे, राजकारणी नाही’ असे उत्तर दिले होते. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता त्याने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे आपले मौन सोडत भूमिका स्पष्ट केली आहे.
दिलजीतच्या पोस्टमध्ये काय?
दिलजीतने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘आज विद्यार्थ्यांसोबत जे घडले ते योग्य नाही. त्यांच्याशी अशा प्रकारची वागणूक दिली जाऊ नये. सरकार आणि प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या शांततेने ऐकाव्यात आणि त्याच्या समस्या सोडवाव्यात. लोकांचा आवाज हाच देवाचा आवाज असतो. मला यापूर्वीही अनेकदा देशविरोधी म्हटले गेले आणि आता पुन्हा तसेच म्हटले जाईल.’
शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत त्याने सांगितले की, त्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याला देशविरोधी ठरवण्यात आले आणि आपली भूमिका मांडल्यामुळे कायदेशीर अडचणीही निर्माण झाल्या. त्या अडचणींबाबत सध्या अधिक बोलू शकत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.

दिलजीत दोसांझ ‘सतलुज’ या चित्रपटामुळे चर्चेत
दरम्यान, दिलजीत दोसांझ त्याच्या ‘सतलुज’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. दिग्दर्शक हनी त्रेहान यांनी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळवण्यासाठी जवळपास चार वर्षे प्रयत्न केले. चित्रपटात तब्बल 127 बदल सुचवण्यात आल्याने तो थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. अखेर चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित करण्यात आला. मात्र, अवघ्या 48 तासांत कोणतेही स्पष्ट कारण न देता तो प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले.
विद्यार्थी आंदोलनावरील दिलजीत दोसांझच्या या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, त्याच्या भूमिकेला काहींनी पाठिंबा दिला आहे तर काहींनी त्यावर टीकाही केली आहे.
