Bigg Boss | मनीषा राणीकडून ‘बिग बॉस’ची पोलखोल; मोबाइलच्या वापरापासून स्क्रिप्टेड एपिसोडपर्यंत केला खुलासा

| Updated on: Aug 28, 2023 | 2:56 PM

सिझन संपल्यानंतर मनीषाने तिच्या युट्यूब व्लॉगमध्ये शोविषयी काही खुलासे केले आहेत. बिग बॉससाठी सेलिब्रिटींची निवड कशी होते, घरात मोबाइल फोनचा वापर होतो का, बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड असतो का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तिने या व्लॉगद्वारे दिली आहेत.

Bigg Boss | मनीषा राणीकडून बिग बॉसची पोलखोल; मोबाइलच्या वापरापासून स्क्रिप्टेड एपिसोडपर्यंत केला खुलासा
Manisha Rani
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन चांगलाच गाजला. या सिझनमध्ये मनीषा राणीला खूप लोकप्रियता मिळाली. ती ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती, मात्र ट्रॉफी न जिंकताच तिला माघार घ्यावी लागली. ‘बिग बॉस ओटीटी 2’चं विजेतेपद एल्विश यादवने पटकावलं होतं. आता सिझन संपल्यानंतर मनीषाने तिच्या युट्यूब व्लॉगमध्ये शोविषयी काही खुलासे केले आहेत. बिग बॉससाठी सेलिब्रिटींची निवड कशी होते, घरात मोबाइल फोनचा वापर होतो का, बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड असतो का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तिने या व्लॉगद्वारे दिली आहेत.

29 वर्षीय मनीषाला विचारलं गेलं की, सलमान खानचा हा रिॲलिटी शो खरंच स्क्रिप्टेड असतो का? तुम्ही कॅमेरासमोर जेवण बनवता, इतर कामं करता, आपापसांत भांडता… हे सर्व नाटकी असतं का? त्यावर मनीषाने सांगितलं की, “असं काहीच नसतं. बिग बॉसच्या घरात फक्त तेच घडतं, जे टीव्हीवर प्रेक्षकांना दाखवलं जातं. सेलिब्रिटी छोटा असो किंवा मोठा.. सर्वांसाठी नियम एकसारखेच असतात. स्पर्धकांना मर्यादित सामान मिळतं आणि त्यातच त्यांना सर्वकाही सांभाळावं लागतं. हा शो अजिबात स्क्रिप्टेड नाही. मी या शोमध्ये शेवटपर्यंत राहिली आहे, त्यामुळे मला सर्वकाही माहीत आहे.”

बिग बॉसच्या घरात पूजा भट्ट फोन वापरत होती, असा आरोप अनेकदा सोशल मीडियावर झाला. त्यावरही मनीषाने उत्तर दिलं. “शोमध्ये कोणालाच फोन वापरण्याची परवानगी नाही. जर पूजा भट्टच्या ऐवजी आलिया भट्ट जरी स्पर्धक म्हणून आली असती, तरी तिला फोन मिळाला नसता”, असं तिने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

मनीषाने हेसुद्धा सांगितलं की बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी कोणतेच ऑडिशन्स होत नाहीत. मात्र स्पर्धकांना आधी बिग बॉसच्या ऑफिसमध्ये बोलावलं जातं. त्यावेळी त्यांचा इंटरव्ह्यू होतो. त्यानंतर स्पर्धकांची अंतिम निवड होते. शो सुरू होण्याच्या दोन महिन्याआधीच स्पर्धकाला त्याची निवड झाली की नाही याबद्दल कळतं. मात्र निर्मात्यांसोबत त्यांना करार करावा लागतो. या करारानुसार ते शोबद्दलची कोणतीच माहिती बाहेर सांगू शकत नाहीत.