
Jagdeep Dhankhar – Salman Khan: भारताचे माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे सर्वत्र त्यांची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनखड यांनी आरोग्यविषयक कारणांमुळे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनखड यांनी राजस्थानमधून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते प्रथम जनता दलाचे खासदार झाले आणि केंद्र सरकारमध्ये मंत्रीही होते. त्यानंतर त्यांनी काही काळ काँग्रेस पक्षातही घालवला. जयदीप धनगड हे पूर्व वकील देखील होते.
राजनीतीमध्ये येण्यापूर्वी जयदीप धनखड हे प्रख्यात वकील होते. त्यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक मोठे खटले लढले. त्यांना स्टील, कोळसा आणि खाणकाम यांसारख्या क्षेत्रात सखोल कायदेशीर अनुभव आहे. सलमान खानच्या प्रसिद्ध काळवीट शिकार प्रकरणात धनखड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे.
2018 मध्ये, जेव्हा जोधपूर न्यायालयाने सलमानला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, तेव्हा त्याला जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आलं. 7 एप्रिल 2018 मध्ये सलमान खान याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. तेव्हा जयदीप धनखड यांनी सलमान खान याची बाजू मांडली. ‘हम साथ साथ है’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान घटना घडली होती.
धनखड यांनी न्यायालयाला सांगितलं, सलमान हा एक लोकप्रिय अभिनेता आहे आणि त्याच्या तुरुंगवासाचा चित्रपट उद्योगावर परिणाम होईल. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य केला आणि सलमानला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला.
जगदीप धनखड यांना 1990 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयातून वरिष्ठ वकिलाचा दर्जा मिळाला. जाट आरक्षणाच्या लढ्यापासून ते हाय-प्रोफाइल खटल्यांपर्यंत, वकिली ते उपराष्ट्रपती होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी राहिला आहे.
जगदीप धनखड यांचा राजीनामा अचानक आला असेल, पण त्यांचा कायदेशीर आणि राजकीय प्रवास नेहमीच लक्षात राहील. सलमान खानसारख्या मोठ्या खटल्यापासून ते उपराष्ट्रपती होण्यापर्यंत, त्यांनी प्रत्येक भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे बजावली आहे.