त्यांना सुपरस्टारच्या पायाची धूळ चाटावी लागणं..; गोविंद नामदेव यांच्यावर भडकले ‘काला हिरन’चे निर्माते
'काला हिरन' या चित्रपटाचा वाद एकीकडे कोर्टात पोहोचला असून दुसरीकडे यातील अभिनेते गोविंद नामदेव यांनी निर्मात्यांविरोधात मोठे आरोप केले आहेत. या आरोपांदरम्यान आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपली बाजू मांडली आहे.

अभिनेता सलमान खानच्या कथित काळवीट शिकार प्रकरणावर आधारित ‘काला हिरन’ या चित्रपटाचा वाद सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. सलमानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारत आहेत. मात्र हा चित्रपट सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणावर आधारित असेल, याची अजिबात कल्पना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. इतकंच नव्हे तर निर्मात्यांनी खोटं बोलून आणि सत्य लपवून शूटिंग करून घेतल्याचा आरोप गोविंद नामदेव यांनी केला. “जर मला याबद्दल आधीच माहिती असती, तर मी कधीच या चित्रपटात काम केलं नसतं. सलमान माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्या विरोधात मी असं काही केलंच नसतं”, असं ते म्हणाले. यावर आता ‘काला हिरन’ या चित्रपटाच्या निर्मात्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘काला हिरन’ या चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी सोशल मीडियावर आपली बाजू मांडली आहे. गोविंद नामदेव यांना फटकारत ते म्हणाले, “हे सगळं काय आहे? ते इतके कमकुवत आहेत की त्यांना एक मीटर लांब जीभ बाहेर काढून एका सुपरस्टारच्या पायाची धूळ चाटावी लागतेय. त्यांना शूटिंगची स्क्रिप्ट वाचून दाखवण्यात आली होती. जोधपूर कोर्टात 1998 ते 2018 पर्यंत जोधपूर कोर्टात काळवीट शिकार प्रकरणाचा जो खटला चालला, त्या 20 वर्षांच्या संपूर्ण खटल्याचं शूटिंग त्या माणसाने सलग तीन-चार दिवस केलं होतं. ती व्यक्ती स्क्रिप्टसह सगळी शूटिंग करत होती. जीपवर लागलेलं रक्त, टायरमध्ये काळवीटचे केस चिकटलेले.. हे सर्व त्यांना माहीत नाही का?”
निर्मात्यांचा व्हिडीओ-
गोविंद नामदेव जी के गले में क़ानून का पट्टा डालकर अदालत में लेकर आयेंगे हम- अमित जानी #kalahiranmovie #amitjani #janifirefox #upcomingmovies pic.twitter.com/ih9n1aFucd
— Amit Jani (@AmitJaniIND) June 14, 2026
अमित जानी यांनी असंही सांगितलं की, या चित्रपटात अयान खानची भूमिका साकारणाऱ्या गोविंद नामदेव यांनी सेटवर काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर स्वत: बोलून कसून चौकशी केली होती. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित अनेक संवाद वारंवार म्हटले होते. मात्र आता ते मुलाखतींमध्ये आपली फसवणूक झाल्याचा खोटा दावा करत आहेत, असं ते म्हणाले. निर्मात्यांनी यावेळी असंही स्पष्ट केलं की कोणत्याही अभिनेत्याला स्क्रिप्टशिवाय शूटिंग करण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही.
गोविंद नामदेव यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना निर्माते पुढे म्हणाले, “हे इतके मोठे कलाकार आहेत. ते पटकथेशिवाय काम करूच शकले नसते. चित्रपटातील डायलॉग मग कोण बोलत होतं? त्यांना सेटवर बंदुकीच्या धाकात ठेवलं होतं का? यात दिशाभूल करणारं किंवा फसवणूक करणारं काय आहे? या चित्रपटाचं नावच ‘काला हिरन’ असं आहे. गोविंद नामदेव यांनी चित्रपट आणि प्रॉडक्शन हाऊसची बदनामी करून आमच्यासोबत केलेला करार मोडला आहे. आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत.”