21 वर्षे जुनं गाणं चित्रपटापेक्षा अधिक लोकप्रिय, युट्यूबवर 721 मिलियन व्ह्यूज; होणाऱ्या पती अन् सासऱ्यांसोबत थिरकली अभिनेत्री
काही गाणी चित्रपटांपेक्षाही जास्त हिट ठरतात. एकवेळ त्या चित्रपटाला प्रेक्षक विसरतील पण त्यातील गाजलेलं गाणं त्यांना तोंडपाठ असेल. असंच एक गाणं 21 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून हिट ठरलं होतं. हे आजही तितकंच लोकप्रिय आहे.

2005 मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीत एकापेक्षा एक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यादरम्यान अशी काही गाणीही तुफान गाजली आणि ज्यांनी लग्नसमारंभात, पार्ट्यांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. आज 21 वर्षांनंतरही ती गाणी लोकप्रिय असून अजूनही त्यावर लोक थिरकतात. युट्यूबवर अशा गाण्यांना कोटींच्या कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. 2005 मध्ये असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामधील एक गाणं त्या चित्रपटापेक्षा अधिक यशस्वी ठरलं. हे गाणं आजसुद्धा ऐकल्यावर डीजेवर आपले पाय आपोआप थिरकू लागतात. विशेष म्हणजे या गाण्यात जे कलाकार झळकले आहेत, त्यामुळेही त्याने प्रेक्षकांचं प्रचंड लक्ष वेधलं होतं. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री त्यात होणाऱ्या पती आणि सासऱ्यांसोबत थिरकली होती.
ज्या चित्रपटाबद्दल आम्ही इथे बोलतोय, त्याचं नाव ‘बंटी और बबली’ असून त्यातलं सर्वाधिक गाजलेलं गाणं आहे ‘कजरा रे’. ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन या तिघांवर हे गाणं चित्रित झालं होतं. याला आजही हिंदी सिनेसृष्टीतील सर्वोत्तम डान्सिंग साँग मानलं जातं. अलिशा चिनॉय, शंकर महादेवन आणि जावेद अली या तिघांनी मिळून हे गाणं गायलं होतं. तर गुलजार यांनी त्याचे बोल लिहिले होते. कोरिओग्राफर वैभवी मर्चंटने या गाण्याची कोरिओग्राफी केली होती. ‘कजरा रे’ हे गाणं राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटापेक्षाही अधिक लोकप्रिय झालं होतं, किंबहुना आजही ते लोकप्रिय आहे.
‘बंटी और बबली’ या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत झाली होती. यशराज फिल्म्सच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर ‘कजरा रे’ हे गाणं अपलोड करण्यात आलं आहे. लिरिक्स आणि फुल व्हिडीओ व्हर्जन मिळून युट्यूबवर ऐश्वर्या रायच्या या गाण्याला एकूण 721 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या आकड्यावरूनच गाण्याची लोकप्रियता लक्षात येते.
या गाण्याच्या चित्रीकरणाच्या काही वर्षांनंतर एका मुलाखतीत कोरिओग्राफर वैभवी मर्चंटला विचारण्यात आलं की, ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाचं थोडंफार श्रेय ती स्वत:ला देते का? त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “माझ्या सेटवर मित्रांपासून प्रियकर-प्रेयसी बनणाऱ्या अनेक कलाकारांची हीच कहाणी आहे. मला आनंद आहे की हे योगायोगाने घडतं आणि त्याचा भाग मी बनते. कधीकधी मी त्यावर पुस्तकही लिहू शकते (हसते). पण अर्थातच त्या क्षणी कोणीही याबद्दल विचार केला नव्हता. मी कधीच कल्पना केली नव्हती की त्या क्षणाचा पुढे असा परिणाम होईल. ते सर्वजण कामाच्या बाबतीत खूप प्रोफेशनल आहेत.” या गाण्याच्या दोन वर्षांनंतर ऐश्वर्या आणि अभिषेकने लग्न केलं.
