‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेतून उलगडणार इतिहासातील महत्त्वाचा अध्याय
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेला प्रेक्षकांकडून अल्पावधीत दमदार प्रतिसाद मिळतोय. या मालिकेच्या आगामी भागात इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्याय उलगडणार आहे. यानिमित्ताने मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत लवकरच समाजसुधारणेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जोतीराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्यातील महत्त्वाचे आधारस्तंभ लहुजी वस्ताद यांची मालिकेत एण्ट्री होणार आहे. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद अर्थात लहुजी राघोजी साळवे यांनी ब्रिटिश सत्तेचा प्रतिकार करण्यासाठी 1822 मध्ये एक तालीम सुरू केली आणि पुण्यातील मुलांना लष्करी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. शस्त्र शिक्षण घेण्यासाठी लहुजींच्या तालमीत जोतीराव फुले येत असत. जोतीराव फुले आणि लहुजी वस्ताद साळवे यांचं नातं हे केवळ गुरु-शिष्याचं नव्हतं तर विचार, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचं प्रतीक होतं.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली शाळा सुरू केली तेव्हा या दाम्पत्याला प्रचंड विरोध झाला. परंतु लहुजी वस्ताद या दोघांच्याही पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या पाठबळावर जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. फुले दाम्पत्याला त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात पाठिंबा देऊन अस्पृश्य बांधवांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी लहुजींनी प्रयत्न केले. सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजीत फडते लहुजी वस्तांदांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
View this post on Instagram
लहुजी वस्ताद आणि जोतीराव फुले यांचं नातं केवळ ऐतिहासिक संदर्भापुरतं न राहता, सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणून मालिकेच्या माध्यमातून सादर केलं जाणार आहे. इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत संध्याकाळी 7.30 वाजता पहायला मिळेल. या मालिकेत मधुराणी गोखले प्रभुलकर आणि अमोल कोल्हे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
मालिकेतील भूमिकेविषयी मधुराणी म्हणाल्या, “सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. इतकं आभाळा एवढं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं मोठी जबाबदारी आहे. आज आपण मुक्तपणे शिकत आहोत, आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम करत आहोत, अभिमानाने मिरवत आहोत. पण त्यासाठी दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला. मला सगळ्यांच्या वतीने सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे.”
