आयुष्याची 17 वर्षे वाया घालवली..; तीन वेळा लग्न मोडल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला पश्चात्ताप
प्रसिद्ध अभिनेत्री नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मी माझ्या आयुष्याची 17 वर्षे तीन लग्नांमध्ये वाया घालवली, अशी खंत तिने बोलून दाखवली. लग्नाच्या या निर्णयांबद्दल तिने पश्चात्ताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री मीरा वासुदेवन ही त्या कलाकारांपैकी एक आहे, जे एका चित्रपटात अशी दमदार भूमिका साकारतात, ज्यासाठी आयुष्यभर त्यांना ओळखलं जातं. मीराने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थनमात्रा’साठी तिला सर्वाधिक ओळखलं जातं. मीरा फक्त तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. वैवाहिक आयुष्यात तिने अनेक चढउतारांचा सामना केला आहे. मीराचं तीन वेळा लग्न मोडलं आहे. या लग्नांबद्दल तिने आता पश्चात्ताप व्यक्त केला आहे. माझ्या आयुष्यातील जवळपास 17 वर्षे मी चुकीच्या नात्यांसाठी आणि अयशस्वी लग्नांसाठी उद्ध्वस्त केली, अशा शब्दांत तिने खंत व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
धन्या वर्माशी बोलताना मीरा म्हणाली, “मी नेहमी माझ्या मुलाला सांगते की मी माझ्या आयुष्यातील 17 वर्षे तीन वाईट लग्नांमध्ये गमावली आहेत. जर मी त्यावेळी समजुतदारपणाने काम केलं असतं, तर आज बरंच काही मिळवलं असतं. मी चित्रपट, फिटनेस आणि माझ्या आवडीच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ शकले असते. मी माझ्या आईवडील आणि बहिणीसोबत अधिक वेळ घालवू शकती असती. परंतु ती वेळ मी अशा लोकांवर वाया घालवली, ज्यांनी कधीच मला महत्त्व किंवा आदर दिला नाही.”
View this post on Instagram
मीरा वासुदेवनने 2005 मध्ये सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचा मुलगा विशाल अग्रवालशी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांचं लग्न फक्त पाच वर्षे टिकलं आणि 2010 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2012 मध्ये तिने मल्याळम अभिनेता जॉन कोक्केनशी दुसरं लग्न केलं. या दोघांना एक मुलगासुद्धा आहे. परंतु 2016 मध्येच ते विभक्त झाले. 2024 मध्ये मीराने सिनमॅटोग्राफर विपिन पुथियनकमशी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मात्र हे नातंसुद्धा फार काळ टिकू शकलं नाही. ऑगस्ट 2025 मध्ये दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
‘थनमात्रा’ या चित्रपटात मीराने मोहनलाल यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा एका अशा व्यक्तीभोवती फिरते, ज्याला अल्जाइमरचा आजार असतो आणि त्याचा परिणाम त्याच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. या चित्रपटात मीराने लेखा रमेशन नावाची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. आजही मीरा मल्याळम चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.
