
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत भारतीय गायक आणि अभिनेता दिलजित दोसांझने ‘सरदार जी 3’ या चित्रपटात काम केल्याने जोरदार टीका झाली. या टीकेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्याची बाजू घेतली होती. दिलजीतला पाठिंबा देणारी एक पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली होती. माझा दिलजीतला खंबीर पाठिंबा आहे, असं त्यांनी लिहिलं होतं. परंतु आता यावरून त्यांनी यू-टर्न घेतल्याचं दिसतंय. कारण नसीरुद्दीन यांनी दिलजीतसाठी लिहिलेली ती पोस्ट आता फेसबुकवर दिसत नाही. ‘फेसबुकवरील ही पोस्ट आता अस्तित्त्वात नाही. कदाचित ती काढून टाकण्यात आली असावी किंवा पोस्टच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये काही बदल केला असावा’, असा मेसेज त्यावर दिसत आहे. त्यामुळे नसीरुद्दीन यांनी त्यांची पोस्ट डिलिट केली असावी, असंही म्हटलं जात आहे.
‘मी दिलजीतसोबत खंबीरपणे उभा आहे. जुमला पार्टीचं घाणेरड्या कारस्थानाचं विभाग त्याच्यावर निशाणा साधण्याच्या संधीची वाटच पाहत होतं. अखेर ती संधी मिळाली, असं त्यांना वाटतंय. चित्रपटातील कास्टिंगसाठी तो जबाबदार नव्हता, दिग्दर्शक होता. परंतु त्यांना कोणीच ओळखत नाही आणि दिलजीतला संपूर्ण जग ओळखतं. त्याने कास्टचा स्वीकार केला कारण त्याच्या डोक्यात कोणतंही विष नाही,’ असं त्यांनी लिहिलं होतं. ‘या गुंडांना भारत आणि पाकिस्तानातील लोकांमधील वैयक्तिक संवाद संपवायचा आहे. माझे जवळचे नातेवाईक आणि काही प्रिय मित्र तिथे आहेत. कोणीही मला त्यांना भेटण्यापासून किंवा जेव्हा मला वाटेल तेव्हा त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ‘पाकिस्तानात जा’ असं म्हणणाऱ्यांना माझं उत्तर असेल की ‘कैलाशला जा’’, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं होतं.
नसीरुद्दीन शाह यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. पहलगाममधील दहशवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याची भूमिका अधिक तीव्र करण्यात आली होती. तरीही दिलजीतने हानियासोबत काम केल्याने, त्यावर जोरदार टीका होत असताना नसीरुद्दीन यांनी त्याची बाजू घेतल्याने नेटकरी भडकले होते. ‘ज्या देशात राहता, जिथे कमावता.. त्याच देशाशी तुम्ही प्रामाणिक राहू शकत नाही’, अशी टीका नेटकऱ्यांनी केली होती.
एप्रिलमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. त्यानंतरही हानिया आमिरचा चित्रपटात समावेश असल्याने भारतात दिलजीतच्या या चित्रपटावरच बंदी घालण्याची मागणी होत आहे. अनेक कलाकारांनी दिलजीतवर टीका केली. तर काहींनी त्याचं समर्थनही केलं.