पत्नीसोबत पॅचअप झाल्यानंतर नवाजुद्दीन म्हणतोय, “लग्नच करू नका..”

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. लोकांनी लग्नच करू नये, असा थेट सल्ला त्याने चाहत्यांना दिला आहे. यामागचं कारणसुद्धा त्याने सांगितलं आहे.

पत्नीसोबत पॅचअप झाल्यानंतर नवाजुद्दीन म्हणतोय, लग्नच करू नका..
Nawazuddin Siddiqui
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 27, 2024 | 3:38 PM

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी त्याच्या दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखला जातो. त्याचसोबत त्याचं खासगी आयुष्यही सतत चर्चेत असतं. नवाजची पत्नी आलियाने त्याच्यावर बरेच आरोप केले होते. हे दोघं विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र भांडणं सोडवून ते पुन्हा एकदा एकत्र आले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवाजुद्दीन लग्नसंस्थेबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. “लग्न करावं का” असा प्रश्न विचारला असता थोडंफार अडखळत तो म्हणाला, “करू नये.” नवाजुद्दीनने रणवीर अलाहाबादियाच्या युट्यूब चॅनलला ही मुलाखत दिली.

या मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला, “मला माझं मत मांडायचं आहे पण कदाचित लोक त्याचा चुकीचा अर्थ घेतील. लोकांनी लग्न करू नये. लग्न करण्याची गरजच काय आहे? जर तुम्ही एकमेकांच्या प्रेमात असाल तर लग्नाशिवायही तुमचं नातं बहरू शकतं. लग्नानंतर लोक एकमेकांना गृहित धरू लागतात.” लग्नानंतर जोडीदारांमधील प्रेम कमी होत जातं असंही मत त्याने मांडलंय.

“जर तुम्ही एकमेकांशी लग्न केलं नाही, तर तुमचं एकमेकांवर अधिक प्रेम असतं. पण लग्नानंतर ते प्रेम कमी होऊ लागतं. मुलंबाळं झाली की बऱ्याच गोष्टी घडतात. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर पुढेही त्याच्यावर प्रेम करत राहण्याची इच्छा असेल तर लग्न करू नका. समाज म्हणतो की आपण विशीत लग्न केलं पाहिजे, त्यानंतर आपण आनंदी राहू शकतो. आपल्याला असं वाटतं की आपलं प्रेम, पत्नी आपल्याला आनंद देईल. परंतु काही काळानंतर फक्त तुमचं कामच तुम्हाला आनंद देऊ शकतो”, असं तो म्हणाला.

पत्नीसोबतच्या वादानंतर अखेर मार्च महिन्यात नवाजुद्दीनने पुन्हा तिच्यासोबत राहण्याचं ठरवलं. आलियाने याआधी दावा केला होता की तिने काही वर्षांपूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मात्र आता दोघांनीही लग्नाचा 14 वा वाढदिवस एकत्र साजरा केला. यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत तिने स्पष्ट केलं की आता त्या दोघांमध्ये काही वाद नाहीत. “एका तिसऱ्या व्यक्तीमुळे आमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या होत्या. पण आता त्या दूर झाल्या आहेत. आम्ही मुलांखातर पुन्हा एकत्र आलो आहोत. मुलगी शोरासोबत नवाजचं खूप घट्टं नातं आहे. आमच्या भांडणांमुळे तिच्यावर खूप परिणाम झाला होता. ती ते सहन करू शकली नाही”, असं आलिया म्हणाली.