
बॉलिवूडचा विनोदी अभिनेता राजपाल यादवला 9 कोटींच्या चेक बाउन्स प्रकरणामुळे काही काळ तुरुंगात मुक्काम करावा लागला होता. काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून बाहेर आला आहे. अशातच आता राजपाल यादवने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे. तो चेक बाउन्स प्रकरणाबद्दल मोकळेपणाने बोलला. तसेच आपल्याकडे येत्या काळात अनेक प्रकल्प आहेत, ज्यामुळे तो श्रीमंत बनू शकतो याचीही त्याने माहिती दिली. तसेच तिहार तुरुंगात असताना आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आलेल्या स्टार्स आणि चाहत्यांचेही त्याने आभार मानले आहेत. तो नेमका काय म्हणाला ते जाणून घेऊयात.
राजपाल यादव म्हणाला की, माझ्या विरुद्ध खटला दाखल करणारे उद्योगपती माधव गोपाल अग्रवाल यांनी 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या आता पता लपता या चित्रपटात 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. हा माझा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. फिल्म सिटीमध्ये शूटिंग झाले तेव्हा तिथे अडीच हजार लोक काम करत होते. जेव्हा चित्रपटाचे 70% काम पूर्ण झाले तेव्हा 10-12 कोटी रुपये खर्च झाले होते. दीड महिन्यानंतर 9.5 कोटी रुपयांचा दुसरा करार झाला. त्यावेळी मी शाहपूरची जमीन गहाण ठेवली होती.
राजपाल यादव यांचे वकील भास्कर यांनी म्हटले की, या पैशांवर व्याज आकारण्यात आले होते, सुरुवातीला त्यांनी पाच कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा दावा केला होता, परंतु मागील करारात ते पाच कोटी रुपयांसाठी आठ कोटी रुपये आकारत होते. ते 60 % व्याजचा दावा करत होते. तक्रारदार राजपालला तुरुंगात टाकू इच्छित होता, त्यामुळे त्याने मालमत्तेची कागदपत्रे स्वीकारण्यासही नकार दिला होता.
राजपाल यादवने पुढे बोलताना म्हटले की, ‘माझा प्रोडक्शन हाऊस उघडण्याचा कोणताही हेतू नव्हता, पण आमच्याशी संबंधित लोकांसाठी ते उघडले जेणेकरून सर्वांना काम मिळेल. गेल्या 20 वर्षात 50 लोकांसोबत व्यवहार केले आहेत कोणालाही प्रॉब्लम झाली नाही. 2026 मध्ये, मी म्हणतो की 2032 पर्यंत राजपाल यादवचा ब्रँडिंग व्यवसाय 1200 कोटी रुपयांचा असेल. माझे 10 चित्रपट येणार आहेत, ज्यात भूत बांगला सारखे अनेक चित्रपट आहेत.