कोणाला सीता बनवलात? ‘रामायणम्’मध्ये साई पल्लवीच्या कास्टिंगवरून भडकला अभिनेता

Ramayanam: नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायणम्' या चित्रपटातील कास्टिंगवरून प्रसिद्ध अभिनेत्याने प्रश्न उपस्थित केला आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत आहे. मात्र तिला का निवडलात, असा सवाल त्यांनी केला आहे.

कोणाला सीता बनवलात? रामायणम्मध्ये साई पल्लवीच्या कास्टिंगवरून भडकला अभिनेता
रणबीर कपूर, साई पल्लवी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 19, 2026 | 11:23 AM

‘रामायणम्’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचपूर्वी त्यातील कलाकारांना समोर आणण्यासाठी मुंबईत एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाद्वारे चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या महत्त्वाच्या कलाकारांची ओळख करून देण्यात आली. तब्बल 4000 कोटी रुपये बजेट असलेल्या या भव्यदिव्य चित्रपटावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड माता सीतेच्या भूमिकेसाठी करण्यात आली आहे. मात्र या निवडीवरून आता दिग्गज अभिनेते अन्नू कपूर यांनी सवाल उपस्थित केले आहेत.

‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाले, “दुसरं काहीतरी बनवा. त्याचं काय झालं? त्यांनी तो प्रदर्शित केला आहे का? तुम्हाला काय वाटतं ते काय बनवतील? त्यांनी काहीही बनवलं तरी, ते फक्त रामानंद सागर यांच्या रामायणात तांत्रिकदृष्ट्या सुधारणा करतील आणि कदाचित त्याची व्याप्ती वाढवतील. पण तुम्ही सीतेची भूमिका साकारण्यासाठी कोणाची निवड केली आहे, हे समजून घ्यायला हवं. सीतेला माता म्हणून पूजलं जातं. या देशात लोक प्रभू श्रीराम यांना भगवान नारायण यांचा अवतार मानून पूजा करतात. त्यामुळे कलाकारांच्या निवडीवर प्रश्न निर्माण होतात.”

पहा व्हिडीओ-

अन्नू कपूर यांनी अशा प्रकारे ‘रामायणम्’ या चित्रपटावर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2023 मध्ये या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अन्नू कपूर त्यावर टीका करत आहेत. त्यावेळी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “कोण आहेत नितेश तिवारी? त्यांची लायकी काय आहे? हिंदू धर्माचा अपमान करून चित्रपट बनवतोय? त्यांना फटका बसेल. आधी धर्म समजून घ्या आणि मगच त्याचं निष्पक्ष परिक्षण करा.” आता पुन्हा एकदा त्यांनी नितेश तिवारी यांना ओळखत नसल्याचा दावा केला आहे. “मी नितेश तिवारी यांना ओळखत नाही. ते कोण आहेत, काय करतात. मी त्यांचे चित्रपट न पाहिल्याने माझं काही नुकसान झालंय असं मला वाटत नाही. त्यांना चित्रपट बनवू द्या”, असा टोला त्यांनी लगावला आहे.

‘रामायणम्’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापैकी पहिला भाग यावर्षी दिवाळीत प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग 2027 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाईल. यामध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल, रवी दुबे, लारा दत्ता, अरुण गोविल, रकुल प्रीत सिंह, कुणाल कपूर, इंदिरा कृष्णन, काजल अग्रवाल, विवेक ओबेरॉय यांच्या भूमिका आहेत.

Follow Us