रश्मिका-विजयने लग्नासाठी का निवडली 10.10 मिनिटांची वेळ? कारण आहे खूपच खास, तुम्ही देखील…
काही दिवसांपूर्वीच रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे विवाहबंधनात अडकले. मात्र, त्यांनी लग्नासाठी 10.10 ही सकाळची वेळ का निवडली. यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding: दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न नुकतेच राजस्थानमधील उदयपूर येथे पार पडले. 26 फेब्रुवारी, गुरुवारी दोघांनी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकत नवीन आयुष्याची सुरुवात केली. या लग्नाची खास गोष्ट म्हणजे त्यांनी सकाळी 10:10 वाजताचा मुहूर्त निवडला होता. यामुळे चाहत्यांमध्ये आणि अंकशास्त्रात रस असलेल्या लोकांमध्ये या वेळेबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या विवाहसोहळ्यात तेलुगू आणि कोडवा या दोन्ही परंपरांनुसार विधी पार पाडण्यात आले. पारंपरिक पोशाख, विधी आणि कौटुंबिक वातावरणात झालेला हा सोहळा अत्यंत खास ठरला. मात्र, या लग्नातील 10:10 या वेळेमुळे सोशल मीडियावर विशेष चर्चेला उधाण आले.
घड्याळांच्या जाहिरातींमध्येही 10:10 का दिसते?
आपण घड्याळांच्या जाहिरातींमध्ये किंवा शो-रूममध्ये ठेवलेल्या घड्याळांकडे पाहिल्यास बहुतांश वेळा त्यावर 10:10 अशी वेळ दाखवलेली दिसते. अनेक घड्याळांवर तास काटा 10 वर आणि मिनिट काटा 2 वर ठेवलेला असतो. त्यामुळे हा वेळ फक्त योगायोग आहे की त्यामागे काही विशेष कारण आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.
अंकशास्त्रानुसार 10:10 चे महत्त्व
अंकशास्त्रात 10.10 या संख्येला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक न्यूमरोलॉजिस्टच्या मते, हा नंबर नवीन सुरुवात, प्रेम, सकारात्मक ऊर्जा आणि यश यांचे प्रतीक मानला जातो. 10. 10 हा ‘एंजेल नंबर’ म्हणूनही ओळखला जातो. जो जीवनात आनंद, पवित्रता आणि चांगल्या संधींचे संकेत देतो.
काही अंकशास्त्रज्ञांच्या मते सकाळी 10:00 ते 10:20 या वेळेचा संबंध ‘लेकाबेल’ नावाच्या एंजेलशी जोडला जातो. हा एंजेल यश, सुरक्षितता आणि नव्या कामांसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे अनेक जण या वेळेला नवीन कामांची सुरुवात करणे शुभ मानतात.
फक्त ट्रेंड की शुभ संकेत?
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नातील 10:10 चा मुहूर्त हा फक्त ट्रेंड आहे की खरोखरच शुभ संकेत आहे, याबद्दल वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. मात्र अंकशास्त्रानुसार या वेळेला सकारात्मकता आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या खास वेळेमुळे त्यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा अधिक रंगली आहे.
