अखेर सलमान – ऐश्वर्याच्या ब्रेकअपमागील खरं कारण आलं समोर; विवेकसोबतचं नातं होतं ‘फेक’?

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपबद्दल एका वरिष्ठ पत्रकाराने मोठा खुलासा केला आहे. सलमान आणि ऐश्वर्याचं ब्रेकअप कशामुळे झालं होतं, हे त्यांनी सांगितलं आहे. त्याचसोबत विवेकसोबतच्या ऐश्वर्याच्या नात्याबद्दलही ते व्यक्त झाले.

अखेर सलमान - ऐश्वर्याच्या ब्रेकअपमागील खरं कारण आलं समोर; विवेकसोबतचं नातं होतं फेक?
Salman Khan and Aishwarya Rai
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 19, 2025 | 2:08 PM

अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप पुढे गेले असले तरी त्यांच्या लव्ह-स्टोरीची चर्चा अजूनही चाहत्यांमध्ये होते. 1990 च्या अखेरीस आणि 2000 च्या सुरुवातीला सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची बॉलिवूडच इंडस्ट्रीत जोरदार चर्चा होती. या दोघांच्या रिलेशनशिपसोबतच त्यांच्या ब्रेकअपनेही चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं. सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या ही अभिनेता विवेक ओबेरॉयला डेट करत होती, असं म्हटलं गेलं. यामुळे सलमान आणि ऐश्वर्यामध्ये कटुता आणखी वाढली गेली. या सर्व घडामोडींच्या बाबतीत आता एका वरिष्ठ पत्रकाराने मोठा खुलासा केला आहे. सलमान आणि ऐश्वर्याचं ब्रेकअप नेमकं कोणत्या कारणामुळे झालं होतं, याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. त्याचसोबत विवेकसोबतच्या ऐश्वर्याला डेटिंगच्या चर्चांना त्यांनी खोटं म्हटलंय.

“सलमान-ऐश्वर्या यांना पुढे न्यायचं होतं नातं”

वरिष्ठ पत्रकार आणि लेखक हानिफ झवेरी यांनी ‘मेरी सहेली’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “सलमान खान आणि ऐश्वर्या रायबद्दल बोलायचं झाल्यास, हे दोघं एकमेकांच्या प्रेमात गंभीर होते. दोघांनाही हे नातं पुढे न्यायचं होतं. परंतु सलमानवर त्यावेळी दुसऱ्या अभिनेत्रींसोबत डेटिंगचं लेबल लागलेलं होतं. सोमी अली, संगीत बिजलानी यांच्यासोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं. त्यामुळे ऐश्वर्याचे पालक सलमानवर फारसे खुश नव्हते. त्यांना असं वाटायचं की हा आमच्या मुलीसोबत फक्त फ्लर्ट करतोय.”

का झालं ब्रेकअप?

हानिफ झवेरी यांनी असाही खुलासा केली की सलमानला ऐश्वर्यासोबत लग्न करायचं होतं. परंतु त्यावेळी ऐश्वर्या लग्नासाठी तयार नव्हती, कारण तिला करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं होतं. सलमानने दारूच्या नशेत ऐश्वर्याच्या इमारतीत प्रवेश करून गोंधळ घातल्यानंतर दोघांमधील परिस्थिती आणखी चिघळली. या घटनेनंतर ऐश्वर्याने सलमानसोबत नातं संपवण्याचा निर्णय घेतला होता.

विवेकसोबतच्या नात्याचं सत्य काय?

सलमाननंतर ऐश्वर्याचं नाव विवेक ओबेरॉयसोबत जोडलं गेलं. त्याविषयी हानिफ झवेरी पुढे म्हणाले, “ऐश्वर्याला जेव्हा फ्रॅक्चर झालं होतं, तेव्हा विवेक फक्त तिची मदत करत होता. तिला रुग्णालयात घेऊन जायचा, व्हिलचेअरवर बसवून तिला फिरवायचा. पण विवेकला यातून काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा होती. तो ऐश्वर्याला दाखवण्याचा प्रयत्न करत होता की तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे, परंतु असं काहीच नव्हतं. याच परिस्थितीचा फायदा घेऊन विवेकने पत्रकार परिषद घेतली होती आणि सलमानच्या विरोधात मुलाखतीसुद्धा दिल्या होत्या.”

“विवेकला हीच गोष्ट महागात पडली. एखादी मुलगी माझ्यावर प्रेम करते, असं बोलणं चुकीचं होतं. खरंतर ते प्रेमच नव्हतं. ते सर्व बनावट होतं. हे सर्व चित्र बनवण्यात आलं होतं”, असं झवेरी म्हणाले. सलमानविरोधातील विवेकच्या मुलाखती त्यावेळी खूप चर्चेत होत्या. या सर्व घटनांनंतर अखेर ऐश्वर्याने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे.