पहिल्या पतीला घटस्फोट देण्याबाबत रेणुका शहाणे यांनी सोडलं मौन; म्हणाल्या “लग्नावरून विश्वासच उडाला”

| Updated on: Mar 03, 2023 | 11:03 AM

या मुलाखतीत रेणुका त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाल्या. रेणुका यांचं पहिलं लग्न विजय केंकरे यांच्याशी झालं होतं. रेणुका लहान असतानाच त्यांचे आईवडील विभक्त झाले आणि त्यानंतर त्यांच्या स्वत:च्या घटस्फोटामुळे लग्नसंस्थेवरील त्यांचा विश्वास कमी झाला.

पहिल्या पतीला घटस्फोट देण्याबाबत रेणुका शहाणे यांनी सोडलं मौन; म्हणाल्या लग्नावरून विश्वासच उडाला
Renuka Shahane and Ashutosh Rana
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : अभिनेत्री रेणुका शहाणे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. रेणुका लहान असतानाच त्यांचे आईवडील विभक्त झाले आणि त्यानंतर त्यांच्या स्वत:च्या घटस्फोटामुळे लग्नसंस्थेवरील त्यांचा विश्वास कमी झाला. “जेव्हा माझं दुसरं लग्न झालं, तेव्हा मी बरीच मोठी होते आणि त्यामुळे नात्यातील आव्हानांना चांगल्या पद्धतीने हाताळू शकले,” असं त्यांनी सांगितलं. पालकांच्या घटस्फोटाचा त्यांच्यावर कसा परिणाम झाला आणि त्यांच्या ‘त्रिभंगा’ या चित्रपटातील एक दृश्यसुद्धा त्यानेच प्रभावित असल्याचं रेणुका यांनी सांगितलं. दिग्दर्शिका म्हणून रेणुका यांचा हा पहिला हिंदी चित्रपट होता. यात काजोल, तन्वी आझमी आणि मिथिला पालकर यांनी भूमिका साकारल्या होत्या. आई आणि लेखिका शांता गोखले यांच्याशी असलेल्या नातेसंबंधावर या चित्रपटाची कथा आधारित होती. रेणुका यांचे वडील विजय शहाणे हे भारतीय नौदलात अधिकारी होते.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “माझ्या आईवडिलांच्या घटस्फोटामुळे सुरुवातीला माझ्याबाबत लोकं सहज मतं बनवायची. यांच्यासोबत खेळू नका, कारण त्यांचं कुटुंब तुटलंय, असं ते म्हणायचे. फक्त मुलंच नाहीत, तर शिक्षकसुद्धा तसेच होते. त्रिभंगा या चित्रपटातील एका दृश्यात जेव्हा मुलीला तिच्या आईबद्दल आणि आडनावाबद्दल विचारलं जातं, ते खरोखर माझ्यासोबत घडलंय.”

हे सुद्धा वाचा

या मुलाखतीत रेणुका त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाल्या. रेणुका यांचं पहिलं लग्न विजय केंकरे यांच्याशी झालं होतं. “मला माझ्या पहिल्या लग्नापासून बरंच काही शिकायला मिळालं होतं. त्यामुळे जेव्हा मी आशुतोष राणा यांच्या प्रेमात पडले, तेव्हा लग्नाविषयीचे माझे विचार काही चांगले नव्हते. त्यावेळी मी माझ्या आयुष्यातील चढउतारांना खूप चांगल्याप्रकारे हाताळू शकत होते, कारण तेव्हा मी वयानेही मोठी होते. दुसऱ्या लग्नावेळी माझं वय 34-35 होतं आणि भारतात लग्नासाठी हे वय खूप जास्त आहे”, असं म्हणत त्या हसल्या. रेणुका आणि आशुतोष राणा यांना दोन मुलं आहेत. शौर्यमान आणि सत्येंद्र अशी दोघांची नावं आहेत.

आशुतोष राणा यांच्याशी लग्नाबाबत त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, “आमचं लग्न टिपिकल लग्न नव्हतं. आम्ही मंदिरात लग्न केलं, त्यामुळे त्या लग्नात खूप लोकं आम्हाला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होती, पण आम्ही आहेर स्वीकारला नव्हता. माझ्या सासरकडून माझे मोठे दीर यांनी माझ्या स्वागतासाठी एक पत्र लिहिलं होतं, त्यांनी दिलेलं ते पत्र मी अजून जपून ठेवलं आहे. त्यामुळे ते पत्र माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेर आहे असं मी म्हणेन.”