त्यांचा आवाज स्पष्ट, निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे..; रितेश देशमुख- जिनिलियाचा आंदोलकांना पाठिंबा

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी संयुक्त पोस्ट लिहित दिल्लीतल्या जंतर मंतर इथल्या आंदोलकांना पाठिंबा दर्शविला आहे. आम्ही त्या तरुणांच्या पाठिशी आहोत, त्यांचा आवाज ऐकला पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.

त्यांचा आवाज स्पष्ट, निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे..; रितेश देशमुख- जिनिलियाचा आंदोलकांना पाठिंबा
रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख यांची पोस्ट
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 21, 2026 | 9:34 AM

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज 32 दिवस आहे. जंतर मंतरवर महिनाभर सुरू असलेल्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधातील तरुणांच्या संयमाचा सोमवारी बांध सुटला. शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात हजारो तरुण- तरुणी संसदेवर धडकले. सोमवारी संसदेला अक्षरश: छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. त्यानंतर आज (मंगळवार) कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके सकाळी जंतर मंतरवर पोहोचले आहेत. या आंदोलनावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित रितेश आणि जिनिलिया यांनी त्यांची बाजू मांडली आहे.

‘आम्ही आपल्या देशातील तरुणांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा आवाज बुलंद, स्पष्ट आणि निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे. ते आपल्या लोकशाहीचा प्राण आणि आपल्या राष्ट्राच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊयात, त्यांना पाठिंबा देऊयात आणि त्यांना सक्षम करुयात. आपल्या तरुणांची ऊर्जा, धैर्य आणि स्वप्नंच आपल्याला इच्छित असलेल्या भारताला घडवतील,’ अशी पोस्ट रितेश आणि जिनिलिया यांनी मिळून लिहिली आहे.

रितेश देशमुख- जिनिलियाची पोस्ट

दरम्यान अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे समर्थकांची आणि आंदोलकांची माफी मागितली आहे. ‘मी माझ्या सर्व समर्थकांची, विशेषत: ज्या मुलींना पोलीस अधिकाऱ्यांनी निर्घृणपणे मारहाण केली आहे, त्यांची माफी मागतो. 20 हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी सरकार आणखी अनेक तरुण विद्यार्थ्यांचं रक्त सांडायला तयार होतं. आम्ही तुम्हा सर्वांसाठी लढत राहू’, असं दीपकेंनी या पोस्टमध्ये म्हटलंय. आज सकाळ पुन्हा जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थी जमण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रातील मंत्र्यांनी इथे येऊन आमच्याशी चर्चा करावी, अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी मांडली आहेत. तर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं दीपकेंनी स्पष्ट केलंय. या पार्श्वभूमीवर धमेंद्र प्रधान यांच्या घराबाहेरील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. तसंच संसद भवन परिसरातील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

Follow Us