नवीन गाण्यांवर समीर अंजान यांची स्पष्ट भूमिका; ‘चुनर सरके’वरून वाद पुन्हा पेटला
‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026’मध्ये गीतकार समीर अंजान यांनी इंडस्ट्रीमधील गाण्याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

WITT: दिल्लीमध्ये आयोजित What India Thinks Today Summit 2026 या कार्यक्रमात देशभरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मंचावर प्रसिद्ध गीतकार समीर अंजान यांनी उपस्थित राहून त्यांच्या कारकिर्दीबद्दल आणि सध्याच्या चित्रपटसृष्टीतील बदलांबाबत मनमोकळे विचार मांडले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक गाणी लिहिण्याचा मान मिळवलेल्या समीर अंजान यांनी बॉलिवूडमधील त्यांच्या दीर्घ प्रवासाचा उल्लेख केला. अनेक पिढ्यांनी त्यांच्या गाण्यांना भरभरून प्रेम दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सध्याच्या काळातील गाणी आणि चित्रपटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संवादांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
कार्यक्रमात ‘केडी: द डेविल’ या चित्रपटातील वादग्रस्त गाणे चुनर सरके यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, सध्या धुरंधर 2 हा चित्रपट मोठा हिट ठरला आहे, पण त्यातील संवादांची पातळीही प्रेक्षकांनी ऐकली आहे. तसेच OTT प्लॅटफॉर्मवर काय दाखवले जाते हेही सर्वांनाच माहिती आहे.
अशा प्रकारची गाणी सेन्सॉर बोर्डपर्यंत कशी पोहोचतात?
समीर अंजान यांनी स्पष्ट केले की, मुद्दा गाणी लिहिण्याचा किंवा न लिहिण्याचा नाही तर अशा प्रकारची गाणी सेन्सॉर बोर्डपर्यंत कशी पोहोचतात हा आहे. सेन्सॉर बोर्ड आहेच कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आजच्या डिजिटल युगात मोबाईलवर कोणतीही सामग्री सहज पाहता येते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी जुने उदाहरण देत चोली के पीछे या गाण्याचा उल्लेख केला. त्या काळात या गाण्यावर मोठा वाद झाला होता. न्यायालयीन प्रकरणही झाले होते. तरीही ते गाणे प्रदर्शित झाले आणि प्रेक्षकांनी त्याला पसंती दिली असे त्यांनी सांगितले.
सध्याच्या काळात संवादांच्या जागी अश्लील भाषा
काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. तो सरकार आणि संबंधित यंत्रणांकडे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या काळात संवादांच्या जागी अश्लील भाषा वापरली जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि भविष्यात गाण्यांमध्येही अशा भाषेचा वापर वाढू शकतो असे मत व्यक्त केले.
तसेच, प्रेक्षकांच्या हातात मोठी ताकद असल्याचे सांगताना त्यांनी म्हटले की, जर लोकांनी ठरवले तर असे कंटेंट एका दिवसात बंद होऊ शकतात. मात्र, प्रेक्षकांना ते आवडत असेल तर ते सुरूच राहणार असेही त्यांनी स्पष्ट केले.
