सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजता… अहिर यांच्या फुटीनंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया काय ?
सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अहिर यांच्या या पक्षांतरामुळे उद्धव ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अहिर यांनी अर्जही भरला. ठाकरे गटातील नेत्यांनी यावर आश्चर्य आणि निराशा व्यक्त केली आहे, ज्यामुळे पक्षांतरामुळे निर्माण झालेला राजकीय हादरा स्पष्ट दिसतो.

अवघ्या 10- 12 दिवसांपूर्वी ठाकरे गटातील 6 खासदार फोडणारे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचा स्पीड काही कमी झालेला नाही. 6 खासादर शिंदे गटात गेल्यावर त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता पुन्हा मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचे विश्वासून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनीही आता डायरेक्ट शिंदे गटाची वाट धरली आहे. एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना फोडलं असून त्यांनी शिदे गटातही प्रवेश केला. मंगळवारी सकाळी सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उरपस्थितीत विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्जही भरला. अहिर यांच्या तडकाफडकी जाण्यामुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसला असून हा धक्का पचवत ठाकरे गटाच्या एकेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.
आम्ही रात्री 9 पर्यंत सोबत होतो
सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, अहिर यांच्या फुटीमुळे त्यांना धक्का बसल्याचे शब्दांतून स्पस्ट जाणवत होते. ‘ सचिन अहिर आणिमी, आम्ही काल रात्री सोबतच होतो. रात्री ९ वाजता आम्ही सोबत गेलो. पण सकाळी त्यांनी असं केलं. त्याला काय करू शकतो?.’ असं म्हणताना त्यांच्या शब्दांतील खंत आणि आश्चर्य दोन्ही लपत नव्हतं.
विधान परिषदेच्या निवडणुकीचा आम्ही फॉर्म भरलेला आहे. निवडणुकीचं उद्या बघू. वरळीत आव्हान निर्माण होणार नाही. वरळी शिवसेनेची आहे. सुनील शिंदेंनी सचिन अहिरांना पराभूत केलं होतं. त्यामुळे आव्हान नाही, असंही ते पुढे बोलता बोलता म्हणाले.
तर वैभव नाईक यांनीही अहिरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया देताना आपण उद्धव ठाकरेंसोबतच आहोत, एकनिष्ठ आहोत हे स्पष्ट केलं. ‘मला काही ऑफर आलेली नाही’. सर्व आमदार उद्धव ठाकरेंसोबतच आहेत. उद्धव ठाकरेंसोबत जे एकनिष्ठ आहेत, ते एकनिष्ठच राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम्हाला हा झटका
अहिरांच्या जाण्यामुळे मोठा धक्का बसला असून मुंबई आमदार महेश सावंत यांनीही यावर स्पष्टपणे मत मांडलं. आम्हालाही हा झटका बसलाय. आम्ही त्यांना भाऊ म्हणून आम्ही बोलायचो. पक्षाने सचिन भाऊंना आमदार केलं, त्यांच्यावर अन्याय केला नाही. पण तरीही ते तिकडे का गेले, त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला , माहिती नाही, असं म्हणताना सावंत यांच्या शब्दांतील नाराजी, निराशा लपत नव्हती.
