Sara Ali Khan | कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपविषयी अखेर सारा अली खानने सोडलं मौन; म्हणाली “तो काळ..”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री सारा अली खान तिच्या ब्रेकअपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. 2020 हे वर्ष अत्यंत वाईट गेल्याचं तिने म्हटलंय. इतकंच नव्हे तर त्याची सुरुवातच ब्रेकअपने झाल्याचं तिने सांगितलंय.

Sara Ali Khan | कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपविषयी अखेर सारा अली खानने सोडलं मौन; म्हणाली तो काळ..
Sara Ali Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 07, 2025 | 2:55 PM

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. करिअर असो किंवा खासगी आयुष्य.. सारा मुलाखतींमध्ये नेहमीच मोकळीपणे व्यक्त झाली. तिचा हाच मनमोकळा स्वभाव अनेकांना आवडतो. साराने 2018 मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘सिम्बा’, ‘अतरंगी रे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या. मात्र 2020 हे वर्ष अत्यंत वाईट गेल्याचं ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली. याच वर्षी तिचा ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये साराने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि इथूनच सगळी सुरुवात झाली.

कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावल्यानंतर आणि आपली ‘मन की बात’ बोलून दाखवल्यानंतर सारा आणि कार्तिक आर्यनला इम्तियाज अली दिग्दर्शित ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. या दोघांनी माध्यमांसमोर कधीच रिलेशनशिपची कबुली दिली नव्हती. मात्र त्यांनी चर्चांना नकारसुद्धा दिला नव्हता.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सारा म्हणाली की 2020 हा तिच्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ होता. “2020 हा माझ्यासाठी अत्यंत वाईट काळ होता. या सगळ्याची सुरुवात ब्रेकअपने झाली आणि पुढे गोष्टी अधिक वाईट होत गेल्या. ते खूपच वाईट वर्ष होतं.”

या मुलाखतीत सारा तिच्या ब्रेकअपविषयी आणि ‘लव्ह आज कल’ या चित्रपटातील भूमिकेवरून झालेल्या ट्रोलिंगविषयी व्यक्त झाली. “कधीकधी तुम्हाला माहित असतं की तुम्ही त्या ट्रोलिंगचे पात्र आहात किंवा कधी एखादी गोष्ट इतकी वाईट घडते आणि त्याविषयी इंटरनेट चर्चा सुरू असते. पण तुमच्यासोबत जे घडलंय त्याच्यासमोर इंटरनेटवरील त्या गोष्टी क्षुल्लक वाटू लागतात. त्याने काही फरक पडत नाही. जर तुम्ही स्वत: दु:खी असाल, थकलेले, घाबरलेले, उदास असाल तर 20 लोकं ती गोष्ट वाचतायत याने काय फरक पडतो. कारण त्यावेळी स्वत:च्याच आत एक ज्वालामुखी आधीपासून फुटत असतो”, असं ती म्हणाली.

साराने ‘लव्ह आज कल’ आणि ‘कुली नंबर 1’ या चित्रपटांमधील चुकांचा स्वीकार केला. चुका करण्याचं माझं वयच आहे, असं म्हणत असतानात त्यातून शिकायला मिळत असल्याचंही तिने मान्य केलं. सारा लवकरच ‘गॅसलाइट’ या चित्रपटात झळकणार आहे. पवन कृपलानी दिग्दर्शित या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मेस्सी आणि चित्रांगदा सिंहची भूमिका आहे.