Rajendra Janjal : मुलीला उपमहापौर करण्यासाठी त्यांचा आटापिटा; राजेंद्र जंजाळ यांचा मंत्री संजय शिरसाटांवर निशाणा, काय दिला खणखणीत इशारा?
Rajendra Janjal on Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या नेतृत्वात महायुती महानगरपालिकेत सत्तेत आली. पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील धुसफूस अजूनही थांबलेली नाही. उपमहापौर पदावरून शिंदे सेनेत जुंपल्याचे समोर आले होते. आता उपमहापौर जंजाळ यांनी नेत्यावर तोंडसुख घेतले आहे.

Rajendra Janjal on Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजपचे समीर राजूरकर हे महापौर झालेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर राजेंद्र जंजाळ हे उपमहापौर पदी विराजमान झाले. पण जंजाळ आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यातील वाद शमता शमलेला नाही. आता शिवसेना जिल्हा प्रमुख आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे.
मुलीला उपमहापौर करण्याचा अट्टहास
छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार संजय शिरसाट यांच्यावर त्यांच्या मुलीला उपमहापौर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नसून ते सत्य असल्याचा दावा जिल्हा प्रमुख आणि उप महापौर राजेंद्र जंजाळ यांच्याकडून करण्यात आला आहे. संजय शिरसाट हे नेहमीच “महाभारतातील संजयप्रमाणे मला राजकारणातील पुढचे दिसते” असे म्हणत असल्याची टोला लगावण्यात आला. कदाचित त्यांना माझे राजकारणातील उज्ज्वल भविष्यही दिसले असेल, असा उपरोधिक उल्लेख जंजाळ यांनी केला आहे.
शिरसाट यांच्यावर मोठी टीका
“मला राजकारणात काय व्हायचे हे माझे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे ठरवतील. मला मोठे करण्याची ताकद त्यांच्यात आहे, त्यामुळे कुणी चिंता करण्याची गरज नाही,” असे स्पष्ट वक्तव्य जंजाळ यांच्याकडून करण्यात आले. जिल्हा परिषद निवडणुकीत संदिपान भुमरे, रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार यांसारखे नेते यशस्वी ठरले, मात्र पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.गंगापूरमध्ये आमदार नसतानाही एक जागा जिंकण्यात यश आल्याचेही जंजाळ यांनी सांगितले.
जिल्हा प्रमुख असताना संजय शिरसाट यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी येऊ दिले नाही, असा आरोपही करण्यात आला. “शिरसाट माझ्याबद्दल बोलतील तर मी उत्तर देत राहणार,” असा इशारा देत भविष्यात दोघांनीही आपापल्या क्षेत्रात काम करावे, असे मत जंजाळ यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.
जंजाळ भविष्यात मुख्यमंत्री
तर मंत्री संजय शिरसाट यांनी जंजाळ भविष्यात मुख्यमंत्री होवोत असा खोचक टोला लगावला. जंजाळ यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य आहे. उपमहापौर पदावर त्यांनी आता चांगले काम करावे आणि पुढे जाऊन ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत असा उपरोधिक टोला शिरसाट यांनी उपमहापौर जंजाळ यांनी लगावला.
