‘एका व्यक्तीवर मन भरत नाही’, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ
'एका व्यक्तीवर मन भरत नाही', बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यावरील वक्तव्याने सोशल मीडियावर उडाली एकच खळबळ.

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्री शहाना गोस्वामी सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत तिने प्रेम, नातेसंबंध आणि ओपन रिलेशनशिपबाबत अत्यंत स्पष्ट आणि बेधडक मत व्यक्त केले. तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून काही जण तिच्या विचारांचे समर्थन करत आहेत तर काहींना तिचे मत आश्चर्यचकित करणारे वाटत आहे.
शहाना गोस्वामी हिने सांगितले की ती स्वतःला पारंपरिक रिलेशनशिपमध्ये फिट मानत नाही. तिच्या मते, प्रेम केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसते. ती म्हणाली की तिच्या आयुष्यात सध्या एकही प्रायमरी पार्टनर नाही, मात्र अनेक लोकांशी तिचे भावनिक आणि वैयक्तिक नाते आहे. तिने स्पष्ट केले की हे संबंध केवळ कॅज्युअल किंवा वेळ घालवण्यासाठी नसून त्यामध्ये विश्वास, समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणा आहे. तिच्या पार्टनर्सना ती इतर लोकांशीही भावनिक आणि शारीरिक नात्यात असल्याची पूर्ण कल्पना असते आणि त्यात काहीही लपवलेले नसते.
नात्यांमध्ये प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा
अभिनेत्रीने सांगितले की कोणत्याही नात्यात प्रामाणिक संवाद सर्वात महत्त्वाचा असतो. दोन व्यक्तींनी एकमेकांशी खुलेपणाने बोलले तर नाते अधिक मजबूत होऊ शकते असे तिचे मत आहे. ती पुढे म्हणाली की प्रेम म्हणजे एखाद्याला बांधून ठेवणे नाही. जर आपण एखाद्यावर खरे प्रेम करत असू तर त्याला त्याच्या पद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्यही दिले पाहिजे. तिच्या मते, प्रेम माणसाला मोकळेपणाची भावना देणारे असावे घुसमट निर्माण करणारे नाही.
मात्र, अशा प्रकारचे नाते निभावणे सोपे नसल्याचेही तिने मान्य केले. मत्सर, असुरक्षितता आणि भीती यांसारख्या भावनांशी सामना करावा लागतो. बाहेरून अशा रिलेशनशिप्स आकर्षक वाटल्या तरी प्रत्यक्ष आयुष्यात त्या टिकवणे कठीण असते असेही ती म्हणाली.
प्रेम कमी नव्हते पण आयुष्याकडून अपेक्षा वेगळ्या होत्या
ब्रेकअपबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की त्यांच्या नात्यात प्रेमाची कमतरता नव्हती. मात्र दोघांनाही आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी हव्या होत्या. अनेकदा नाते संपण्यामागे प्रेम कमी असणे हे कारण नसते तर विचारांमधील फरक आणि चुकीची वेळ कारणीभूत असते असे तिने सांगितले. तिच्या मते, एखादे नाते पुढे चालत नसेल तर ते जबरदस्तीने टिकवण्यापेक्षा वेगळे होणे अधिक योग्य ठरते.
