‘धुरंधर 2’च्या लाटेत 10 कोटी बजेटच्या चित्रपटाचा बोलबाला; 6 दिवसांत कमावला 302% नफा
बॉक्स ऑफिसवर सध्या रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2'चा कब्जा असला तरी अवघ्या दहा कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे. या सर्वसामान्य चित्रपटाने सहा दिवसांत 302 टक्के नफा कमावला आहे. हा कोणता चित्रपट आहे, ते जाणून घ्या..

सध्या थिएटरमध्ये कोणता चित्रपट गाजतोय, असा प्रश्न विचारला तर ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हेच उत्तर तुम्हाला मिळेल. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात तब्बल 1600 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची दररोज कोट्यवधी रुपयांमध्ये कमाई होत आहे. ‘धुरंधर 2’च्या लाटेत आपला निभाव लागणार नाही या भीतीने अनेक चित्रपटांनी प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. परंतु यात एक असाही चित्रपट आहे, ज्याला रणवीर सिंहच्या या चित्रपटाने काही फरकच पडला नाही. ‘धुरंधर 2’च्या त्सुनामीतही हा चित्रपट जबरदस्त कमाई करतोय. सकारात्मक वर्ड ऑफ माऊथच्या जोरावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे.
या चित्रपटाचं नाव आहे ‘वाझा 2’. मूळ मल्याळम भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट दररोज चांगली कमाई करतोय. हा चित्रपट या वर्षातील सर्वांत मोठा मल्याळम हिट चित्रपट बनला आहे. यामध्ये हाशिर एच, अजीन जॉय, विनायक वी आणि एलन बिन सिराज मुख्य भूमिकेत आहेत. हा एक कॉमेडी ड्रामा असून 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वाझा’चा स्पिरिच्युअल सीक्वेल आहे.
‘वाझा 2: बायोपिक ऑफ अ बिलियन ब्रोज’ या मल्याळम कॉमेडी चित्रपटाने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी 7.10 कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या सहा दिवसांत भारतात या चित्रपटाची कमाई 40.20 कोटी रुपये इतकी झाली आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 91.46 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. केरळमध्ये या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळतोय. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट फक्त दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. या खर्चाच्या तुलनेत चित्रपटाने आतापर्यंत 40.20 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर 30.2 कोटी रुपयांचा परतावा (ROI) मिळाला आहे. हा परतावा 302 टक्के इतका होता. ‘वाझा 2’ने 283.75% इतका लाइफटाइम परतावा देणाऱ्या ‘प्रकंबनम’ या चित्रपटालाही मागे टाकलं आहे.
‘वाझा 2’ या चित्रपटाची कथा हाशीर, अॅलन, अजिन आणि विनायक या चार मित्रांभोवती फिरते, ज्यांना अनेकदा अपयशी आणि त्रास देणारे म्हणून हिणवलं जातं. प्रचंड सामाजिक दबावाला तोंड देत असताना ते आत्मशोधाच्या एका भावनिक प्रवासाला निघतात. त्यात आलेल्या विविध आव्हानांमधून हे चौघं जण जबाबदारी स्वीकारायला आणि स्वत:च्या अटींवर यश मिळवायला शिकतात.
