NEET च्या वादावर बोलणं भोवलं, ‘इंडियन आयडॉल’नं दाखवला बाहेरचा रस्ता? गायक म्हणाला..
प्रसिद्ध गायक विशाल ददलानीला नीट पेपरफुटीच्या वादावर बोलणं महागात पडल्याची चर्चा सुरू आहे. त्याला इंडियन आयडॉल 16 च्या परीक्षकपदावरून काढून टाकल्याचं म्हटलं जात आहे. यावर आता खुद्द विशालनेच प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जो विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली मतं बेधडकपणे मांडत असतो. विशाल गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन आयडॉल 16’ या शोमध्ये परीक्षक म्हणून झळकत आहे. नुकताच त्याने देशातील नीट पेपरफुटीच्या वादावर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं. नीट पेपरफुटीच्या वादावर आणि देशाच्या दयनीय स्थितीवर नाराजी व्यक्त करत त्याने म्हटलं होतं की, “कृपया अशा अडाणी मूर्खांना सत्तेवर बसवू नका.” यानंतर त्याला ‘इंडियन आयडॉल 16’च्या परीक्षकपदावरून काढून टाकण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आलं. आता या चर्चांवर खुद्द विशालनेच प्रतिक्रिया दिली आहे.
विशालने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि त्यात त्याने स्पष्ट केलं की या वृत्तांमध्ये काहीच तथ्य नाही. सोशल मीडियावर पसरलेल्या या अफवांची खिल्ली उडवत विशालने लिहिलं, “लक्षात ठेवा, ऑनलाइन दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. खूप मोठ्या प्रमाणात हेराफेरी सुरू आहे. जे योग्य आहे, त्यासाठी लढत राहा आणि जे बोलायला हवं ते बोलत राहा.” या व्हिडीओमध्ये विशाल गमतीने इंडियन आयडॉलच्या सेटवर रडण्याचं नाटक करतानाही दिसला. त्यानंतर तो खळखळून हसतो आणि म्हणतो, “मी इथेच आहे.” म्हणजेच इंडियन आयडॉलमधून त्याला काढून टाकलेलं नाही. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.
विशाल ददलानीचा व्हिडीओ-
View this post on Instagram
नीट पेपरफुटीप्रकरणी काय म्हणालेला विशाल?
“ज्या विद्यार्थ्यांना नीट पेपरफुटीचा फटका बसला आहे, त्रास सहन करावा लागला आहे, ज्यांचा वेळ वाया गेला आहे, ज्यांचं कदाचित वर्ष वाया जाईल, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी हा व्हिडीओ पोस्ट करतोय. हे अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा सरकारी यंत्रणा जबाबदारी घेत नाही, तेव्हा ते आणखी चुकीचं ठरतं. जे मंत्री म्हणत आहेत की, यात काय मोठी गोष्ट आहे, आम्ही राजीनामा देणार, तेव्हा तर परिस्थिती अधिकच वाईट आहे. हे लज्जास्पद आहे. दुर्दैवाने आपण एका अशा काळात जगत आहोत, जिथे शिक्षणाचं काहीच महत्त्व नाही. कारण जे सत्तेत आहेत ते सुशिक्षित नाहीत. ही गोष्ट भारताला उद्ध्वस्त करू शकते. तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण हेच सत्य आहे. शक्य झालं तर किमान सुशिक्षित लोकांना निवडून द्या. चांगल्या लोकांना, सुशिक्षित लोकांना मत द्या. जात, धर्म, वर्ण या सर्वांमधून बाहेर पडून जर तुम्हाला तुमचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर, या देशाचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर आपल्याला चांगल्या लोकांना निवडून द्यावंच लागेल. अशा अडाणी मूर्खांना सत्तेवर आणू नका, जरी ते तुमच्या कुटुंबातील का असेना. अशा लोकांना मत देऊ नका”, असं तो म्हणाला होता.
