तब्बल 4000 कोटी बजेटचा ‘रामायण’ सिनेमा फ्लॉप झाला तर..; नुकसानाबद्दल निर्माते स्पष्टच बोलले
'रामायण' या चित्रपटावर प्रचंड मेहनत घेतली जात असून त्याच्या दोन्ही भागांवर तब्बल 4000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. इतका पैसा खर्च केल्यानंतर जर हा चित्रपट फ्लॉप झाला तर काय करणार, यावर निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण पार्ट 1’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाचा इतका बोलबाला आहे की, तो आता मोठ्या पडद्यावर पाहताना कसा अनुभव येईल, याची अनेकांमध्ये उत्सुकता आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील हा सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, ‘रामायण’ या चित्रपटाचा बजेट तब्बल 4000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे इतके पैसे खर्च केल्यानंतर जर हा चित्रपट फ्लॉप झाला किंवा बॉक्स ऑफिसवर त्याला अपेक्षित यश मिळालं नाही तर काय करणारा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यावर आता खुद्द निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“फक्त भारतीयांना खुश करण्यासाठी नाही..”
‘लॉस एंजिलिस टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत नमित मल्होत्रा म्हणाले, “रामायण हा चित्रपट आम्ही जगभरातील प्रेक्षकांसाठी बनवतोय. जर परदेशातील लोकांना प्रभावित करण्यात हा चित्रपट अयशस्वी ठरला, तर आमच्यासाठी हे सर्वांत मोठं अपयश असेल. आमचा ‘रामायण’ हा चित्रपट संपूर्ण जगासाठी आहे. त्यामुळे जर हा चित्रपट तुम्हाला, प्रेक्षकांना आवडला नाही, तर आमच्यासाठी ही अत्यंत लज्जास्पद बाब असेल. आम्ही सुरुवातीपासूनच हा चित्रपट ग्लोबल ऑडियन्स म्हणजेच जगभरातील प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून बनवतोय. मी हा चित्रपट फक्त भारतात भारतीय लोकांना खुश करण्यासाठी बनवत नाहीये.”
रामायणचे दोन भाग
यावेळी निर्मात्यांनी ‘रामायण’ या चित्रपटाची तुलना हॉलिवूडच्या ‘अवतार’, ‘ग्लॅडिएटर’ आणि ऑस्कर विजेता दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या चित्रपटांशी केली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. याचा पहिला भाग येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तर दुसरा भाग पुढच्या वर्षी 2027 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या मुख्य भूमिका आहेत.
‘रामायण – पार्ट 1’चा ट्रेलर येत्या 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘रामायण’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड निश्चित झाली. चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला होता. अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत असून लारा दत्ता कैकेईची भूमिका साकारणार आहे. फक्त साई पल्लवीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं आहे. अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.
