Eetha : तमाशा फडातच प्रसूती, दगडाने ठेचली नाळ; कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?
अभिनेत्री श्रद्धा कपूर 'ईठा' या चित्रपटात तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या टीझरने सर्वांचं लक्ष वेधलंय. विठाबाई कोण होत्या आणि त्यांचा संघर्ष कसा होता, याविषयीची कथा चित्रपटात पहायला मिळणार आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ‘छावा’ फेम लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून टीझरमधील श्रद्धाच्या लूकने आणि एकंदर कथेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या टीझरनंतर विठाबाई नारायणगावकर यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘ईठा’ या चित्रपटात 1940 ते 1990 च्या दशकापर्यंतचा त्यांचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. यामध्ये त्यांचा संघर्ष आणि त्यांना मिळालेलं यश अत्यंत सुंदररित्या चित्रित करण्यात आलं आहे.
कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?
विठाभाई भाऊ मांग नारायणगावकर या महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलाकार, लावणी नृत्यांगना आणि लोकगायिका होत्या. त्यांना ‘तमाशा सम्राज्ञी’ म्हणून ओळखलं जातं. 1 जुलै 1935 रोजी त्यांचा जन्म पंढरपुरातल्या एका कलावंत कुटुंबात झाला. त्यांचं बालपण तमाशाच्या फडातच गेलं. आजोबा नारायण खुडे आणि वडील भाई बापू नारायणगावकर यांचा स्वत:चा तमाशाचा फड होता. विठाबाईंनी वयाच्या दहाव्या वर्षी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय रंगमंचावर सादरीकरण करण्यास सुरुवात केली. लावणी, गवळण यांसारख्या लोकगीतांचं गायन आणि त्यावर नृत्य सादर करण्यात त्या पारंगत होत्या. परंतु त्यांचा पुढील प्रवास काही सोपा नव्हता.
पहा ‘ईठा’चा टीझर-
‘ईठा’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये एक प्रसंग दाखवण्यात आला आहे. विठाबाईंच्या आयुष्यात खरोखर घडलेली ही घटना असून, त्याबद्दल ऐकल्यावर आजही अंगावर काटा येतो. गरोदर विठाबाईंनी तमाशाच्या फडातच मुलीला जन्म दिला होता. नऊ महिन्यांच्या गरोदर असलेल्या विठाबाईंना एका कार्यक्रमादरम्यान प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या, मात्र तरीही त्या थांबल्या नाहीत. जेव्हा कळा असह्य झाल्या, तेव्हा त्या स्टेजच्या मागे जाऊन तंबूत बाळाला जन्म दिला. त्यावेळी विठाबाईंनी स्वत: दगडाने बाळाची नाळ ठेचून तोडली, असं म्हटलं जातं. प्रसूतीनंतर अवघ्या काही मिनिटांतच त्या स्टेजवर परतल्या होत्या.
विठाबाईंच्या उत्कृष्ट कलेची दखल घेऊन राष्ट्रपतींनी त्यांना 1957 आणि 1990 मध्ये पदकं देऊन सन्मानित केलं. 15 जानेवारी 2002 रोजी विठाबाईंनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने ‘विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ 2006 साली सुरू केला. विठाबाईंची लेक मंगलाताई बनसोडे यासुद्धा प्रसिद्ध लावणी नृत्यांगना असून त्यांनादेखील राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
