Zubeen Garg : झुबीन गर्गला मारल्याचा कट? मुख्यमंत्र्यांकडून CID चौकशीचे आदेश, दोघांविरोधात FIR
Zubeen Garg death : प्रसिद्ध गायक झुबीन गर्गच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली. याप्रकरणी श्यामकानू महंता हे नाव सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

Zubeen Garg death : ‘या अली’ या ब्लॉकबस्टर गाण्याचा गायक झुबीन गर्गचं 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगदरम्यान मृत्यू झाला. तो 52 वर्षांचा होता. झुबीनच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककला पसरली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी घोषणा केली की, झुबीनच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी केली जाईल. राज्य सरकारने आसाम पोलिसांना या घटनेसंदर्भात दाखल केलेल्या सर्व एफआयआर सविस्तर चौकशीसाठी सीआयडीकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान झुबीनच्या निधनानंतर श्यामकानू महंता आणि सिद्धार्थ शर्मा ही दोन नावं सर्वाधिक चर्चेत आहेत. या दोघांविरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. श्यामकानू महंता हे नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे मुख्य आयोजक होते, तर सिद्धार्थ शर्मा हे झुबीनचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते.
झुबीनच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे श्यामकानूवर प्रचंड टीका केली जातेय. श्यामकानू हे आसामचे असून ते उद्योजक आहेत. ट्रेंड एमएमएस या नॉन प्रॉफिट ट्रस्टचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 2023 मध्ये त्यांनी दिल्लीत नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हल सुरू केला. त्यानंतर ते हा फेस्टिव्हल बँकाँकला घेऊन गेले. सिंगापूरला होणाऱ्या चौथ्या ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे ते आयोजक होते. याच फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी झुबीन सिंगापूरला गेला होता.
View this post on Instagram
“श्यामकानू महंता आणि सिद्धार्थ शर्मा या दोघांचीही याप्रकरणी चौकशी केली जाईल. त्याचप्रमाणे झुबीनच्या शेवटच्या क्षणी त्याच्यासोबत उपस्थित असलेल्यांचीही चौकशी केली जाईल”, असं आसामच्या मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. झुबीनच्या निधनानंतर फेस्टिव्हल रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, आसामने 20 ते 22 सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा शोक जाहीर केला आहे.
सिंगापूरमधील रुग्णालयात निधन झाल्यानंतर झुबीनचं पार्थिव विमानाने गुवाहाटीमध्ये आणण्यात आलं. याठिकाणी त्याचे वडील, पत्नी आणि इतर जवळचे कुटुंबीय त्याचं अंत्यदर्शन घेतील. त्यानंतर त्याचं पार्थिव सरुसजाई स्टेडियममध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. ‘राज्य सरकार कोणताही निर्णय एकतर्फी घेणार नाही. त्याच्या कुटुंबीयांशी, जवळच्या सहकाऱ्यांशी आणि सार्वजनिक संघटनांशी सल्लामसलत केल्यानंतरच अंत्यसंस्काराचं ठिकाण आणि वेळ निश्चित केली जाईल’, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
