H3N2 चा कहर वाढला, हरियाणा, कर्नाटक नंतर आता ‘या’ राज्यात झाला तिसरा मृत्यू,, जाणून घ्या परिस्थिती

H3N2 Virus News : दिल्लीपासून देशातील विविध राज्यांमध्ये इन्फ्लूएंझा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या विषाणूमुळे हरियाणा आणि कर्नाटकमध्ये यापूर्वी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

H3N2 चा कहर वाढला, हरियाणा, कर्नाटक नंतर आता या राज्यात झाला तिसरा मृत्यू,, जाणून घ्या परिस्थिती
Image Credit source: Freepik
| Updated on: Mar 14, 2023 | 9:07 AM

नवी दिल्ली : सध्या देशात इन्फ्लूएंझा (फ्लू)चा H3N2 विषाणू (virus) खूप वेगाने पसरत आहे. यामुळे देशातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेले असतानाच आता या व्हायरसमुळे देशात तिसरा मृत्यू (3rd death) झाल्याची बातमी समोर आली आहे. यापूर्वी हरियाणा व कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला होता. तर आता गुजरातमधील (Gujrat)वडोदरा येथे हा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान 58 वर्षीय महिलेचे निधन झाले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, या महिलेला आधीच अनेक आजार होते. ती उच्च रक्तदाबाची रुग्ण होती आणि व्हेंटिलेटरवर होती.

वर नमूद केल्याप्रमाणे H3N2 या विषाणूमुळे हरियाणा आणि कर्नाटकमध्ये यापूर्वी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीपासून देशातील विविध राज्यांमध्ये इन्फ्लूएंझा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डॉक्टरांच्या मते, H3N2 हा इन्फ्लूएंझा ए चा उपप्रकार आहे, जो यावेळी खूप सक्रिय झाला आहे. या विषाणूने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये सर्दी-खोकल्याचीची लक्षणे दिसत असली तरी हळूहळू हा विषाणू रुग्णाच्या फुफ्फुसात पोहोचतो. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

5 वर्षांखालील मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांना या विषाणूचा सर्वाधिक धोका आहे कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते, असे डॉक्टरांनी नमूद केले. या विषाणूने त्रस्त रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्यास त्यांचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळेया याबाबतीत अजिबात निष्काळजीपणा करू नका. काहीही त्रास जाणवल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात घेऊन यावे, असेही डॉक्टरांनी नमूद केले.

स्वच्छतेची घ्या नीट काळजी, डॉक्टरांचा इशारा

डॉक्टरांच्या मते, फ्लूची लस H3N2 विषाणूला रोखण्यासाठी सर्वात प्रभावी आहे. ही लस शरीरात अँटीबॉडीज बनवते. ही लस लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या रोगाशी लढण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. हवामान बदलत असल्याने आता हा विषाणू अधिक वेगाने पसरू शकतो. अशा परिस्थितीत लोकांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, या विषाणूने ग्रस्त रुग्णांच्या लक्षणांमध्ये ताप, कफ आणि नाक वाहणे यांचा समावेश होतो. यासोबतच रुग्णांना अंगदुखी, उलट्या किंवा जुलाब यांसारख्या समस्यांचाही सामना करावा लागतो.

अशी घ्या काळजी

H3N2 विषाणू रोखण्यासाठी व त्याचा आपल्याला संसर्ग होऊ नये यासाठी देशभरातील नागरिकांनी पुरेशी काळजी घेतली पाहिजे. काही गोष्टींचे पालन केल्यास हा संसर्ग दूर ठेवता येऊ शकेल.

– सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा

– गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा

– हात स्वच्छ ठेवा. सॅनिटायझरचा वापर करा.

– डोळे, नाकाला, तोंडाला वारंवार स्पर्श करु नका

– खोकताना किंवा शिंकताना मास्क लावा

– सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

– भरपूर पाणी प्या

– ताजी फळे आणि फळांचा रस यांचे सेवन करा.

– पौष्टिक आहाराचे सेवन करून प्रतिकारशक्ती वाढवा.

– नियमित व्यायाम करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us