
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव कमालीचा वाढला असून, त्याची झळ आता दुबईपर्यंत पोहोचली आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवरही दिसून येत आहे. दुबईत असलेल्या तेलुगू अभिनेता विष्णू मंचू यांनी आपल्या घराजवळील आकाशात मिसाइल्स दिसत असल्याचा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या हल्ल्याच्या आवाजाने त्यांचे संपूर्ण घर हादरले असून, त्यांची लहान मुलगी आयरा खूप घाबरली असल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे तो व्हिडीओ?
विष्णू मंचू कुटुंबाला भेटण्यासाठी दुबईला गेले होते. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आकाशात मिसाइल्स उडताना आणि इंटरसेप्ट होताना दिसत आहेत. “मी दुबईत कुटुंबाला भेटायला आलो आहे. आकाशात मिसाइल्स स्पष्ट दिसत आहेत. मोठ्या स्फोटांनी आमचे घर हादरले आणि लहान आयरा घाबरली,” असे त्यांनी लिहिले. त्यांनी पुढे म्हटले की, “कोणत्याही मुलावर अशी वेळ येऊ नये की त्याला छतावरून युद्धाचा आवाज ऐकत मोठे व्हावे लागेल.” तसेच, नागरिकांचे रक्षण केल्याबद्दल यूएई संरक्षण दलाचे आभार मानले आणि शांततेसाठी प्रार्थना केली. “हर हर महादेव,” असेही ते म्हणाले.
In Dubai visiting family tonight. Missiles visible in the sky. The loud interceptions shook our home and frightened little Ayra.
Praying for peace. No child anywhere should grow up hearing the sound of war above their roof.
Grateful to the UAE defense forces for keeping… pic.twitter.com/tCbE78eoBY
— Vishnu Manchu (@iVishnuManchu) February 28, 2026
आणखी एक अभिनेत्री अडकली
दुसरीकडे, दुबई विमानतळावर अनेक भारतीय प्रवासी अडकले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान (Sonal Chauhan) ही शूटिंगसाठी दुबईला गेली होती, पण आता ती विमानतळावरच अडकली आहे. सर्व उड्डाणे रद्द झाल्याने भारतात परतण्याचा मार्ग बंद झाला आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारकडे मदत मागितली आहे. “इथे तणावपूर्ण परिस्थिती आहे. कोणतीही विमाने उडत नाहीत. भारतात परत येण्याचा स्पष्ट मार्ग नाही. भारत सरकारने आम्हाला इथून बाहेर काढावे,” अशी विनंती तिने केली आहे.
या संघर्षामुळे दुबईसह संपूर्ण गल्फ प्रदेशातील हवाई वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. लाखो प्रवासी, पर्यटक आणि व्यवसायिक अडकले असून, भारतीय दूतावास आणि सरकारकडून मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक भारतीय सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिक यात अडकले असल्याने ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या घटनांमुळे मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती किती व्यापक आणि धोकादायक झाली आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.