भारत बांगलादेशच्या संबंधांवर थेट परिणाम, पुन्हा बांगलादेशने तेच केले, पाकिस्तानच्या नादाला लागून..
बांगलादेश पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जवळीकता वाढत आहे. मक्का संरक्षण करारात बांगलादेशला सहभागी व्हायचे आहे. तसे विधानही त्यांच्याकडून केले जातंय. आता बांगलादेशने थेट संकेत दिल्याचे बघायला मिळतंय.

भारत आणि बांगलादेशचे संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. बांगलादेश पाकिस्तानच्या नादी लागतोय. भारताविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला कोणत्याही पद्धतीने बांगलादेशला आपल्या बाजूने करायचे आहे. बांगलादेश अत्यंत चालाखीने इस्लामिक नाटोमध्ये सहभागी होत आहे. नुकताच ढाकाने त्यांच्या विधानात म्हटले की, पाकिस्तान, साैदी अरेबिया, तुर्की यांच्यातील करारात काही धोका नाही. त्यामुळे इतर देशांसोबत असलेल्या नात्यावर कोणताही परिणाम होणार नाही. थेट या करारात सहभागी होण्याचे संकेत त्यांनी दिले. जर बांगलादेश या करारात सहभागी झाला तर त्यांचे भारतासोबतचे संबंध तणावात येऊ शकतात, असे सांगितले जातंय. मात्र, या करारातून कोणत्याही देशासोबतच्या संबंधांवर परिणाम होणार नसल्याचे बांगलादेशने म्हटले.
बांगलादेशचे राज्य मंत्री हुमायूं कबीर यांनी रविवारी मक्का संरक्षण करारावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, ढाका द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करेल आणि सकारात्मक दिशेने पाऊले उचलेल. बांगलादेशला विदेश नीती आणि सुरक्षा सहयोग संतुलनासाठी पुढे जावे लागेल. कोणत्याही देशासोबत संरक्षण करार करण्याचा अर्थ असा नाही की, आम्ही दुसऱ्या देशासोबत संबंध ठेवणार नाही. मात्र, बांगलादेशला या संरक्षण करारात सहभागी होण्यासाठी तसे निमंत्रण मिळाले नाही, पण बांगलादेश मात्र बाशिंग बांधून बसलाय.
मुद्द्यात परत परत बोलून भारताला भडकवण्याचे काम बांगलादेश करत आहे. या संरक्षण करारात साैदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की या देशांनी संरक्षण करारावर सह्या केल्या आहेत. इस्लामिक नाटोच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे सांगितले जातंय. जर पाकिस्ताननंतर बांगलादेश या करारात सहभागी झाला तर भारताचे टेन्शन वाढणार आहे. भारतावरील दबाव वाढवण्यासाठी पाकिस्तानकडून या गोष्टी घडवून आणल्या जात आहेत.
बांगलदेशचे मंत्री खालिलुर रहमान यांनी कालच बोलताना म्हटले की, जर बांगलादेशला या कराराचे निमंत्रण मिळत असेल तर बांगलादेश या करारात सहभागी होण्यासाठी सकारात्मक गोष्टीने विचार नक्कीच करेल. 7 ऑगस्ट रोजी साैदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की यांनी मक्का संरक्षण करार केला. तीनपैकी एका देशावर हल्ला करण्यात आला तर तो तिन्ही देशांवर समजला जाणार. आता याच मक्का संरक्षण करारा बांगलादेशलही सहभागी होण्याची शक्यता आहे.
