Bangladesh PM Oath : तारिक रहमान यांच्या शपथविधीला भारतातून हा नेता जाणार, नाव आले समोर
Tarique Rahman : 17 तारखेला बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या समारंभाला भारताकडून एक बडा नेता उपस्थित राहणार आहे.

बांगलादेशमध्ये अलिकडेच निवडणुका पार पडल्या. यात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बहुमत मिळवले आहे. आता 17 तारखेला बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या समारंभाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आहे. या सोहळ्यासाठी भारताकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना बांगलादेशला पाठवले जाणार आहे. त्यांच्यासोबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री देखील असणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ओम बिर्ला बांगलादेशला जाणार
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा 17 फेब्रुवारी रोजी ढाका येथील राष्ट्रीय संसद भवनाच्या दक्षिण प्लाझा येथे पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले होते, मात्र याच काळात मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा आणि दिल्लीत AI शिखर परिषदेच्या तयारीमुळे पंतप्रधान मोदी बांगलादेशला जाऊ शकणार नाहीत. त्यांचा जागी ओम बिर्ला बांगलादेशला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा दणदणीत विजय
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बांगलादेशच्या 13 व्या संसदीय निवडणुकीत दमदार विजय मिळवला आहे. तारिक रहमान आता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहोत. त्यांचे वडील झियाउर रहमान बीएनपीचे संस्थापक होते आणि त्यांची आई खालिदा झिया माजी पंतप्रधान होत्या. रहमान यांनी 2008 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे देश सोडला होता. मात्र अलिकडेच पार पडलेल्या निवडणुकीत रहमान यांनी दोन तृतीयांश बहुमत मिळवून इतिहास रचला. आता पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था आणि आर्थिक स्थिरता मजबूत करण्याचे आवाहन त्यांच्यासमोर असणार आहे.
दोन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारणार
तारिक रहमान यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी रोजी फोनवरून रहमान यांचे अभिनंदन केले आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या सर्व बलिदानांची आठवण केली. त्यांच्या शपथविधीला जगभरातील अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आता भारतही आपले प्रतिनिधी पाठवणार आहे. हे दोन्ही देशांमधील नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. बीएनपीने नेहमीच भारतासोबत संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारण्याची शक्यता आहे.
