Burj Khalifa : बुर्ज खलीफा इमारत बांधणारा बिल्डर नोकरीत भारतीयांनाच प्राधान्य का देतो? उत्तर वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
Burj Khalifa Builder : जग प्रसिद्ध बुर्ज खलीफा ही इमारत एम्मार कंपनीने बांधली आहे. या कंपनीचे मालक मोहम्मद अलाब्बर भारतीयांचे मोठे चाहते आहेत. ते त्यांच्या कंपनीत नोकरीमध्ये भारतीयांना विशेष प्राधान्य देतात. त्यामागचं कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल.

बुर्ज खलीफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. ही इमारत आज दुबईची ओळख बनली आहे. संयुक्त अरब अमीरातला येणारे पर्यटक बुर्ज खलीफा पहायला जरुर येतात. बुर्ज खलीफा हा जगप्रसिद्ध इमारत एम्मार कंपनीने बांधली आहे. या कंपनीचे सर्वेसर्वा मोहम्मद अलाब्बर यांनी भारतीयांचं भरभरुन कौतुक केलं आहे. मोहम्मद अलाब्बर त्यांच्या एम्मार कंपनीत नोकरी देताना भारतीयांना विशेष प्राधान्य देतात. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. कामाबद्दलची नैतिकता आणि समर्पण हे भारतीयांचे गुण त्यांना विशेष भावतात. अर्ध्यारात्री सुद्धा भारतीय कामासाठी तयार असतात असं मोहम्मद अलाब्बर म्हणाले. त्यांच्या मते बिझनेसमधल्या यशात बुद्धिमत्तेचा भाग कमी असतो. सातत्याने प्रयत्न करणं आणि मेहतन यांचा रोल यशामध्ये जास्त असल्याचं अलाब्बर मानतात. चांगली टीम बांधणं, मोजूनमापून धोका पत्करणं आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी खूप महत्वाची असल्याचं ते मानतात. मेक इट इन एमिराट्स समिटमध्ये ते बोलत होते.
त्यांच्या कंपनीत जास्त भारतीय का आहेत? त्यावर बोलताना ते म्हणाले की, “या मागचं कारण कुठलं पुस्तकी ज्ञान नाही. धडपड, काहीतरी करण्याची उमेद. रात्री 1 वाजताही फोन केल्यावर भारतीय प्रतिसाद देतात” अलाब्बर यांच्या मते जगात प्रतिभा भरपूर आहे. पण भारतीयांसारखी मेहनत करणारी माणसं आणि शिस्त मिळणं कठीण आहे. “माझ्या स्वत:च्या दृष्टीकोनातून मी नेहमी लोकांना सांगतो की, माझा IQ सामान्य आहे. पण माझी मेहनत सर्वोत्तम आहे. माझा मेहनतीवर विश्वास आहे” असं अलाब्बर सांगतात.
म्हणून मला भारतीय जास्त भावतात
भारतीय हे कामाप्रती निष्ठावान, कटिबद्ध असतात. दिवसातील कुठल्याही वेळी प्रतिसाद देण्याच्या भारतीयांच्या स्वभावामुळे माझा भारतीय टॅलेंटवर जास्त विश्वास असल्याचं ते सांगतात. “जितकी तुम्ही जास्त मेहनत कराल, तितके तुम्ही जास्त नशिबवान ठराल. असं म्हणतात, मेहनत टॅलेंटवर मात करते. जेव्हा टॅलेंट फेल होतं, तेव्हा जास्त मेहनत करा. म्हणून मला भारतीय जास्त भावतात” असं अलाब्बर म्हणाले.
बिझनेसबद्दल काय व्हिजन सांगितलं?
“प्रत्येकासाठी काही कठोर अनुभव असतात. कोविड संसर्ग आणि अन्य संकटाच्या काळात काही धडे शिकायला मिळाले. 2008 ची मंदी आणि कोविड संसर्गाच्या काळात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तुम्ही असा बिझनेस उभा केला पाहिजे, जो त्या परिस्थितीतही टिकून राहील” असं अलाब्बर यांनी सांगितलं. या अनुभवावरुन धडा घेत एम्मार कंपनीने अलीकडच्या संकट परिस्थितीत कर्मचाऱ्यांचं हित सुरक्षित करण्यासाठी काही पावलं उचलली. “कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षित आणि नियमित पगार मिळेल याची हमी दिली. मागच्या संकटातून जे शिकायला मिळालं त्यातून हे निर्णय घेतले” असं अलाब्बर म्हणाले.
