“बजरंग दलावर कारवाई करण्यास फेसबुक घाबरलं, कर्मचाऱ्यांवर हल्ला होईल म्हणून नमती भूमिका”

| Updated on: Dec 14, 2020 | 4:39 PM

अमेरिकेचं प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द वॉल स्ट्रीट जनरल’ने फेसबुकने (Facebook) द्वेषपूर्ण पोस्टवरुन (Hate Speech) धार्मिक कट्टरतावादी संघटना बजरंद दलवर (Bajrang Dal) कारवाई करण्यास टाळटाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

बजरंग दलावर कारवाई करण्यास फेसबुक घाबरलं, कर्मचाऱ्यांवर हल्ला होईल म्हणून नमती भूमिका
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेचं प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द वॉल स्ट्रीट जनरल’ने फेसबुकने (Facebook) द्वेषपूर्ण पोस्टवरुन (Hate Speech) धार्मिक कट्टरतावादी संघटना बजरंद दलवर (Bajrang Dal) कारवाई करण्यास टाळटाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. बजरंग दलावर कारवाई केल्यास भारतातील आपल्या व्यवसायावर याचे विपरित परिणाम होतील अशी भीती वाटत असल्यानेच त्यांनी या संघटनेच्या द्वेषपूर्ण पोस्टवर कारवाई केली नाही, असंही वॉल स्ट्रीट जनरलने आपल्या वृत्तात म्हटलं आहे (Facebook is soft while action on Bajrang Dal claim in The Wall Street Journal).

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने म्हटलं, “फेसबुकच्या सुरक्षा टीमने बजरंग दलाला धोकादायक संघटना म्हणून अहवाल दिला होता. यानंतरही संपूर्ण भारतात अल्पसंख्यांकांवर हिंसक हल्ल्यांना पाठिंबा देणाऱ्या बजरंग दल (Bajrang Dal) संघटनेवर राजकीय आणि सुरक्षाविषयक कारणांमुळे कारवाई झाली नाही. ही संघटना सोशल नेटवर्कवर कायम राहिली.” ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने (The Wall Street Journal) रविवारी (13 डिसेंबर) हे वृत्त प्रकाशित केलं आहे.

“सत्ताधारी भाजपसोबत संबंध असल्याने फेसबुक हिंदुत्ववादी संघटनांवर कारवाई करण्यास घाबरत आहे. बजरंग दलावर कारवाई केल्यास फेसबुकला भारतात व्यावसायिक तोटो होईल आणि फेसबुकच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होतील अशी भीती वाटत होती,” असंही या अहवालात म्हटलं आहे.

फेसबुकच्या माजी वरिष्ठ अधिकारी अंखी दास यांच्यावरही भाजपसोबत तडजोड केल्याचा गंभीर आरोप

ऑगस्टमध्ये वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुक कारवाई करताना भेदभाव करत असल्याचा अहवाल प्रकाशित केला होता. यात फेसबुकवर भारतातील सत्ताधारी भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण पोस्टवर कारवाई न करण्याचा आरोप होता. यात मुख्य आरोप फेसबुक इंडियाच्या कार्यकारी अधिकारी अंखी दास यांच्यावर होते. त्यांनी मुस्लीम विरोधी द्वेषपूर्ण पोस्ट करणाऱ्या भाजपच्या नेत्यांची बाजू घेतल्याचा आरोप होता. विशेष म्हणजे फेसबुकवरील या अहवालानंतर काही दिवसातच फेसबुकने या नेत्यावर कारवाई केली. याशिवाय गंभीर आरोप झालेल्या अंखी दास यांना देखील फेसबुकच्या आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

बजरंग दलाची द्वेषपूर्ण पोस्ट कोणती?

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार बजरंग दलाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये बजरंग दलाने जूनमध्ये नवी दिल्लीतील एका चर्चवर हल्ला केल्याची जबाबदारी स्वीकारली होती. हा व्हिडीओ 2.5 लाख वेळा पाहिला गेला होता.

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार फेसबुकच्या एका अंतर्गत अहवालात म्हटलं आहे की, “भारतातील सत्ताधारी हिंदू राष्ट्रवादी राजकीय नेते, बजरंग दल यांच्यावर निर्बंध लावल्यास फेसबुकच्या कर्मचाऱ्यांवर किंवा कंपनीवर हल्ले होऊ शकतात. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांच्या एका गटाने एक अंतर्गत पत्र फेसबुक डिस्कशन ग्रुपवर पोस्ट केलं आहे. यात फेसबुक प्लॅटफॉर्मवर बजरंग दलावर कारवाई न करणं हे कंपनीच्या द्वेषपूर्ण पोस्टवर कारवाई करण्याच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.”

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानंतर फेसबुकचे प्रवक्ते अँडी स्टोन म्हणाले, “आम्ही जागतिक स्तरावर राजकीय स्थिती आणि पक्ष यांचा विचार न करता धोकादायक व्यक्ती आणि संघटनांवर कारवाई करण्याच्या धोरणाचा अवलंब करतो.”

हेही वाचा :

‘फेसबुकच्या द्वेषपूर्ण पोस्ट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा’, काँग्रेसचं थेट मार्क झुकरबर्गला पत्र

भाजपशी लागेबांधे असल्याचा आणि पक्षपाताचा आरोप, Facebook इंडियाच्या अंखी दास यांचा राजीनामा

‘फेसबुकची मोदी सरकारसोबत तडजोड’, माजी अध्यक्षांचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक केल्याने काँग्रेसचा गंभीर आरोप

Facebook is soft while action on Bajrang Dal claim in The Wall Street Journal