
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलने पुकारलेल्या यु्द्धाला आज दोन आठवडे पूर्ण होतील. हे युद्ध थांबण्याऐवजी दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे. सर्वसामान्यांना आता या युद्धाच्या झळ जाणवू लागल्या आहेत. कच्चा तेलाचं संकट दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केला आहे. याच मार्गवरुन जगाला लागणाऱ्या 20 टक्के कच्चा तेलाची वाहतूक होते. हा मार्ग बंद असल्यामुळे जगातील अनेक देशांसमोर कच्चा तेलाचं संकट निर्माण झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या प्रति तेल पिंपाची किंमत 100 डॉलरच्या पुढे गेली आहे. अमेरिकेने रशियन तेल खरेदीवर लावलेले प्रतिबंध 30 दिवसांसाठी हटवले आहेत. वाढत्या किंमती नियंत्रणात आणणं आणि जागतिक तेल पुरवठा सुरळीत सुरु रहावा हा त्यामागे उद्देश आहे. आता इराणने यावरुन अमेरिकेला टोमणा मारला आहे.
भारताने रशियन तेल खरेदी करु नये यासाठी अमेरिकेने आधी भारतावर दबाव आणला. आता जगाला रशियन तेल खरेदीसाठी विनवण्या करत आहे असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी टोला लगावला. “भारताने रशियाकडून तेल आयात थांबवावी यासाठी अमेरिकेने महिनोमहिने भारतावर दबाव टाकला. इराणसोबतच्या दोन आठड्याच्या युद्धानंतर व्हाइट हाऊस आता भारतासह सगळ्या जगाला रशियाकडून कच्च तेल खरेदी करा असं सांगत आहे” असं अराघची यांनी एका वर्तमानपत्राची कटिंग X वर पोस्ट करुन म्हटलं.
किती दयनीय आहे हे
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये युरोपवर सुद्धा निशाणा साधला. “युरोपला वाटलेलं की, इराण विरूद्धच्या या बेकायद युद्धात अमेरिकेला साथ दिल्याने रशिया विरुद्ध अमेरिकेचं त्यांना समर्थन मिळेल. किती दयनीय आहे हे’ असं अराघची यांनी पोस्टमध्ये म्हटलय.
तितकं ते जगभरात विकू शकतात
रशियन तेलावर अमेरिकेने प्रतिबंध हटवले त्यावर अराघची यांनी ही पोस्ट केली आहे. अमेरिकेने युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियन तेलावर प्रतिबंध घातले होते. शुक्रवारी अमेरिकेने या तेलावरील प्रतिबंध 30 दिवसांसाठी हटवले. त्यामुळे 12 मार्चपर्यंत जितकं तेल रशियन ऑईल टँकरवर लोड झालय, तितकं ते जगभरात विकू शकतात.
युरोपमध्येही मतभेद आहेत
ट्रम्प सरकारच्या या निर्णयावर युरोपमध्येही मतभेद आहेत. शुक्रवारी जर्मनीच्या चांसलर फ्रेडरिक मर्ज यांनी हा निर्णय मान्य नसल्याचं म्हटलं. युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियावर आणखी दबाव टाकला पाहिजे असं ते म्हणाले. रशियन तेलावरील प्रतिबंध हटवू नयेत, ज्यामुळे रशियाचा फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे.