
मिडिल ईस्टमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली समुद्री सुरक्षा आणि ऊर्जा पुरवठा मजबूत करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय नौदलाने ओमानची खाडी आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुज जवळ आपल्या युद्धनौकांची संख्या वाढवली आहे. या भागातून तेल-गॅस वाहतुकीला असलेला धोका लक्षात घेऊन भारतीय नौदलाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय झेंडा असलेले टँकर्स आणि जहाजांना सुरक्षित भारतात आणणं हा नौदलाचा मुख्य उद्देश आहे. याच सुरक्षा घेऱ्यातून INS शिवालिक, आयएनएस सुनयना आणि जग लाडकी ही जहाजं सुरक्षितरित्या भारतीय बंदरात पोहोचली आहेत.
2019 पासून मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट नुसार या क्षेत्रात सामान्यत: भारताच्या 1 ते 3 युद्धनौका तैनात असतात. पण आता यांची संख्या पहिल्यापेक्षा वाढवण्यात आली आहे. किती युद्धनौका नेमक्या तैनात केल्या आहेत, ते सुरक्षा कारणांमुळे सांगितलेलं नाही. भारतीय जहाजांना धोकादायक भागातून सुरक्षितरित्या बाहेर काढणं हे तैनात युद्धनौकांचं मुख्य काम आहे. सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये भारताची 22 जहाजं आहेत. भारतीय नौदलाचं या स्थितीवर अत्यंत बारीक लक्ष आहे.
दोन मोठी ऑपरेशन्स सुरु
भारतीय नौदलाकडून सध्या दोन मोठी ऑपरेशन्स सुरु आहेत. पहिल ऑपरेशन संकल्प. ओमानच्या खाडीत हे सुरु आहे. पायरसी विरुद्ध हे ऑपरेशन आहे, अदनच्या खाडीत समुद्री डाकूंना रोखण्यासाठी हे ऑपरेशन चालवलं जात आहे.
भारताने यातून काय संकेत दिले?
2017 पासून भारतीय नौदल मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट अंतर्गत 6 प्रमुख समुद्री भागात सतत तैनात असते. या अंतर्गत युद्धनौका या मित्र देशांसोबत युद्ध सराव करतात. आपातकाळात मदत आणि बचाव कार्याचं अभियान चालवतात. वाढत्या क्षेत्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने हे रणनितीक पाऊल उचललं आहे. भारताने आम्ही आमची जहाजं आणि तेल पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रसंगी आवश्यक पावलं उचलू शकतो हे संकेत दिले आहेत. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील जल वाहतूक रोखून धरली आहे. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांकडे मदत मागितली आहे. त्यांना त्यांच्या युद्धनौका उतरवण्याचं आवाहन केलय. पण नाटो देशांनी ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.