महाराज हात छाटायचे, तुम्ही वृत्ती छाटा..; नसरापूर अत्याचारप्रकरणी अंकिता वालावलकरची सरकारकडे विनंती
भोरमधील नसरापूर इथं साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली. या प्रकरणी संपूर्ण राज्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अंकिता वालावलकरनेही सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत राग व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून संपूर्ण राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (1 मे) उघडकीस आली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. सोशल मीडियावर सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीसुद्धा संताप व्यक्त करत आहेत. इन्फ्लुन्सर आणि ‘बिग बॉस मराठी’ची माजी स्पर्धक अंकिता वालावलकर हिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘आता सहनशीलता नाही, आता कठोर निर्णयांची वेळ आहे. अशा गुन्ह्यांसाठी जलदगती न्याय, कठोर शिक्षा आणि शून्य सहनशीलता हाच एकमेव मार्ग आहे. समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत. चूक पाहून गप्प बसणं म्हणजे त्या गुन्ह्याला पाठिंबा देणं आहे. आपल्याकडे कायदे आहेत, पण त्यांची भीती नाही. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि मग निष्पाप मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. प्रत्येक मुलगी सुरक्षित असलीच पाहिजे. हा तिचा हक्क आहे, कोणाचे उपकार नाहीत. मुलींवर होणारे अत्याचार थांबलेच पाहिजेत ,आत्ता आणि इथेच,’ असं कॅप्शन लिहित तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
काय म्हणाली अंकिता?
“ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि महाराष्ट्रात घडलेली ही काही पहिलीच घटना नाही. या अशा घटना वारंवार घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा असं काही घडायचं, तेव्हा महाराज त्यांचे हात छाटून टाकायचे. कारण ही वृत्ती छाटणं गरजेचं आहे. आपण काय करतोय? अशा घटना झाल्यानंतर आपण फक्त मोर्चे काढतोय, निषेध नोंदवतोय आणि न्याय मागतोय. पण न्याय काय आपल्याला मिळत नाहीये. मला सरकारला, विरोधी पक्षांना आणि सर्वांना एकच विनंती करायची आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर एक ठोस कायदा येणं तितकंच गरजेचं आहे. आपल्याकडे आताही कायदे आहेत, पण त्याच्यात तितक्याच पळवाटा आहेत आणि त्या पळवाटांमुळेच अशा गोष्टी घडतात. ती व्यक्ती असेच गुन्हे करून तुरुंगातून बाहेर आली होती. बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा इतका मोठा गुन्हा केलाय. त्या चिमुरडीने अजून जग बघितलंही नव्हतं. विचार करा, आज तिच्या आईवडिलांना काय वाटत असेल? आपण विचारही करू शकत नाही, एवढा त्यांना त्रास होत असेल. तो ठोस कायदा येणं खूप महत्त्वाचं आहे, ज्या कायद्यामुळे भीती निर्माण होईल आणि भीतीमुळेच अशी कृत्ये होणं थांबतील”, असं म्हणत अंकिताने सरकारकडे अशा कृत्यांविरोधात कठोर कायदा आणण्याची विनंती केली आहे.
View this post on Instagram
अंकिताच्या या व्हिडीओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘खरंच प्रचंड चीड आणि संताप येतोय घटनेचा . या नीच नराधमाला भर चौकात सगळ्यांनी सामूहिक शिक्षा देऊन त्याचे हाल हाल करून त्याला मृत्युदंड देण्यात यावा अशी माझी सरकारला विनंती आहे . त्याची मौत इतकी भयानक असावी की पुन्हा असा गुन्हा करण्याची कुणाचीही किंमत होता कामा नये,’ अशी कमेंट मेघा धाडेनं केली आहे.
