5 State Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये काँटे की टक्कर, 5 राज्यात मतमोजणी सुरु, पहिले कल कोणाच्या बाजूने?
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. तामिळनाडू, केरळ आणि आसाममधील निकालांचे सविस्तर अपडेट्स वाचा.

देशाच्या राजकारणाची आगामी दिशा ठरवणाऱ्या आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून या पाचही राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. साधारण ३० ते ४० मिनिटांत टपाली मतपत्रिकांची (Postal Ballots) मोजणी केली जात आहे. यानंतर ईव्हीएम (EVM) मधील मतांची मोजणी केली जाणार आहे.
पहिल्या काही तासांतील चित्रानुसार अनेक राज्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप-तृणमूलमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तर तामिळनाडूत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या द्रमुकने (DMK) ६३ हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.
राज्यानुसार सुरुवातीचे कल
पश्चिम बंगाल (२९३ जागा) : पश्चिम बंगालमध्ये २९३ जागांवर मतदान पार पडले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. पहिल्या अर्धा तासात भाजपने ७२ तर टीएमसीने ६९ जागांवर आघाडी घेतली आहे. भवानीपूर या हाय-प्रोफाइल जागेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यात चुरस आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
तामिळनाडू (२३४ जागा): मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या द्रमुकने (DMK) १५ जागांवर आघाडी कायम ठेवली असली. तर सुपरस्टार थलपथी विजय यांच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाने ३ जागांवर आघाडी घेत राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथे तिरंगी लढत होत आहेत.
केरळ (१४० जागा): केरळमध्ये सत्तांतर होणार की एलडीएफ इतिहास घडवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या युडीएफ (UDF) २५ जागांवर तर सत्ताधारी एलडीएफ (LDF) १५ जागांवर पुढे आहे. एनडीए ९ आणि इतर २ जागांवर आघाडी घेत आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे.
आसाम (१२६ जागा): मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजप विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. सुरुवातीच्या पोस्टल मतमोजणीत आलेल्या कलानुसार भाजप ५४ तर काँग्रेस ९ जागेवर आघाडीवर आहे.
पुद्दुचेरी (३० जागा): केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीत एन. रंगस्वामी यांच्या नेतृत्वाखालील एनआरसी (NRC) १३ जागांसह पुन्हा सत्तेकडे वाटचाल करताना दिसत आहे. तर काँग्रेसने ३ जागांवर आघाडी घेतली आहे.
विक्रमी मतदानामुळे धाकधूक वाढली
नुकत्याच पार पडलेल्या या ५ राज्यांच्या निवडणुकीत मतदारांनी ऐतिहासिक उत्साह दाखवला आहे. पश्चिम बंगालमध्ये स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक म्हणजे ९२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. तर तामिळनाडूमध्येही ८५.१४ टक्क्यांसह मतदानाचे सर्व जुने विक्रम मोडले गेले आहेत. मतदानाचा हा वाढलेला टक्का नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाची सत्ता उलथवून लावणार, हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल. सध्या सर्वच मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सध्या पोस्टल मतमोजणी सुरु असून त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरु होऊन त्याचे कल समोर येणार आहेत. यानंतरच विजयाचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.
