मोठी बातमी! इराण-अमेरिकेतील चर्चा पुन्हा फिस्कटली, जगाला पुन्हा युद्ध पहावे लागणार? पाकिस्तानात काय घडलं?
Iran US Talks Break Down : इराण आणि अमेरिकेतील युद्ध थांबवण्यासाठीच्या करारावर पाकिस्तानात चर्चा होणार होती, मात्र आता ही चर्चेची दुसरी फेरी मावळल्याचे दिसत आहे.

गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून इराण आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली असली तरी युद्ध अद्याप थांबलेले नाही. अशातच दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानात युद्ध थांबवण्याबाबतच्या करारावर चर्चा होणार होती, मात्र आता ही चर्चेची दुसरी फेरी मावळल्याचे दिसत आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची मोठ्या प्रतिनिधीमंडळासह इस्लामाबादला पोहोचले होते. पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थाची भूमिका निभावणार होता, मात्र आता अमेरिकन प्रतिनिधी पाकिस्तानात पोहोचण्याआधीच इराणचे प्रतिनिधी पाकिस्तानमधून निघून गेले. असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इराणी अधिकाऱ्यांनी पाकिस्तान सोडलं
समोर आलेल्या माहितीनुसार, इराण थेट अमेरिकेशी चर्चा करण्यास तयार नाहीये, त्यामुळे पाकिस्तान दोन्ही देशांदरम्यान संदेश पोहोचवण्याचे काम करत आहे. अमेरिकेकडूनही विशेष दूत इस्लामाबादमध्ये येणार होते, मात्र आता इराणी प्रतिनिधी नसल्यामुळे अमेरिकन अधिकारी पाकिस्तानात येणार की नाही याबाबत सविस्तर माहिती समजू शकलेली नाही. अराघची यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. यानंतर इराणी प्रतिनिधी पाकिस्तानमधून रवाना झाले.
इराण इतरही देशांच्या संपर्कात
आज (शनिवार) अब्बास अराघची मोठ्या टीमसह इस्लामाबादमध्ये पोहोचले होते. तेथे त्यांनी शहबाज शरीफ यांची भेट घेतली. या बैठकीत पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इसाक दार आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हेही उपस्थित होते. आता अराघची मस्कत (ओमान) आणि मॉस्कोलाही (रशिया) जाणार आहेत. म्हणजेच इराण अनेक देशांशी संपर्क साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.
इराणचा थेट चर्चेला नकार
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघेही यांनी स्पष्ट सांगितले की, या टप्प्यात इराण आणि अमेरिका यांच्यात थेट बैठक होणार नाही. पाकिस्तानच्या माध्यमातूनच इराण आपली भूमिका आणि चिंता अमेरिकेसमोर मांडणार आहे. कारण इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कारवाईला ‘अमेरिकेने लादलेले आक्रमक युद्ध’ असे संबोधले आणि पाकिस्तान शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले. आता नेमकी पुन्हा चर्चा होणार की दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.