
मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरू आहे, याचा फटका भारतासह जगभरातील सर्वच देशांना बसला आहे. भारतात एलपीजी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या खरेदीसाठी नियम बनवले आहेत. सिलिंडर मिळत नसल्यामुळे काही ठिकाणी हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच काही ठिकाणी खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इराण आणि अमेरिकेतील हे युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता इंधनासह इतरही क्षेत्राला याचा फटका बसताना दिसत आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसताना दिसत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम केवळ इंधनापुरता मर्यादित न राहता खत, औषधे आणि अन्नधान्यांवरही दिसू लागला आहे. त्यामुळे हे युद्ध लवकर थांबले नाही किंवा दीर्घकाळ चालले, तर संकट फक्त कच्चे तेल किंवा एलपीजीपुरते मर्यादित राहणार नाही, तर इतर क्षेत्रांवरही परिणाम होईल. या युद्धाचा परिणाम आता खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून औषधांपर्यंत दिसू लागला आहे. आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढू लागल्या आहेत. खासकरून खनिज तेलाच्या किमती 113 डॉलर प्रति बॅरल इतक्या झाल्या आहेत.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून तेलसंकट वाढत चालले आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून काही ठिकाणी कोरोनासारखी निर्बंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आली आहे. भारतातही एलपीजीची टंचाई जाणवू लागली आहे. सरकारने उत्पादन वाढवण्यावर भर दिला असला तरी अनेक शहरांमध्ये परिस्थिती बिकट आहे.
मध्य पूर्वेतील संघर्षामुळे इतर क्षेत्रांवरही परिणाम होत आहे. दिल्लीतील भागीरथी मार्केटमध्ये औषधांच्या किमतींवर परिणाम दिसून आला. दिल्ली ड्रग ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष आशीष ग्रोवर यांनी इंडिया टुडेला सांगितले की, औषधांसाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने आयात केला जातो, आता आयात खर्च वाढला आहे. तसेच अॅल्युमिनियम आणि प्लास्टिकच्या वाढलेल्या किमतींमुळे पॅकेजिंग खर्चही वाढला आहे, ज्यामुळे औषधांच्या एकूण किमती वाढल्या आहेत. सध्या बाजारात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असला, तरी पुढील काळात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
या युद्धामुळे शेतीसाठी लागणाऱ्या खतांची टंचाई निर्माण होऊ शकते. विश्लेषकांच्या मते, खत उत्पादनासाठी नैसर्गिक वायू अत्यंत महत्त्वाचा असून उत्पादन खर्चाचा सुमारे 70% भाग त्यावर अवलंबून असतो. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे खाडी प्रदेशातील अनेक खत कारखाने बंद झाले आहेत किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे खतांची आयात थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तेल आणि गॅसच्या संकटामुळे आधीच अन्नधान्यांच्या किमती वाढल्या आहेत. चहा-नाश्ता ते हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायावर परिणाम झाला असून अन्नपदार्थांचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे युद्धात सामान्य माणून होरपळताना दिसत आहे.