Assam Election Result 2026 : मामा, मियां… या नेत्यानं कसा राखला गड? काय आहे या शब्दांचा अर्थ?
आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपने हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवला. 'मामा' आणि 'मियां' या दोन शब्दांभोवती सरमांनी यशस्वी रणनीती आखली. महिलांशी भावनिक नाते जोडून 'मामा' बनले, तर 'मियां' धोरणाने मतांचे ध्रुवीकरण केले. सरमांच्या या दुहेरी रणनीतीने आसाममध्ये सत्ता राखण्यात भाजपला मोठे यश मिळाले.

आसाम विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. नॉर्थ ईस्टच्या राजकारणाचे किंग हिंमत बिस्वा सरमा हेच ठरले आहेत. भाजपने पुन्हा एकदा आसाममध्ये विजयाची हॅट्रीक मारली आहे. सुरुवातीच्या कलामध्ये आसाममध्ये भाजप आघाडीला 95 तर काँग्रेस आघाडीला 28 जागा मिळताना दिसत आहे. या निकालामुळे राजकीय विश्लेषकही हैराण झाले आहेत. आसामच्या विजयाची स्क्रीप्ट ही एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमासारखीच आहे. ही निवडणूक दोन शब्दांभोवती फिरत आहे. मामा आणि मियां या दोन शब्दांभोवती ही निवडणूक फिरली होती आणि त्यात भाजपला विजय मिळाला आहे.
हिंमत बिस्वा सरमा हे राज्यातील महिलांचे मामा बनले आहेत. सरमा यांना मामा म्हणून ओळखलं जातं. निवडणुकीत हेच नातं भावनिक बनलं. तर दुसरीकडे मियां पॉलिटिक्स करून भाजपने राज्यात मतांचं यशस्वी ध्रुवीकरण केलं. विरोधकांना बचाव करण्याचा कोणतीही संधी दिली नाही. या दोन शब्दाने अख्खं राजकारण कसं फिरवलं त्यावरच प्रकाश टाकूया.
मामा बनले, भावनिक नातं
आसाममध्ये लहान मुलांपासून बुजुर्ग महिलांपर्यंत सर्वांसाठी हिमंत बिस्वा सरमा केवळ मुख्यमंत्री नाहीत. त्यांच्यासाठी ते मामा आहेत. सर्वजण त्यांना मामा म्हणूनच हाक मारतात. राजकारणात बरेच नेते स्वत:ला जनतेचा सेवक, समाजसेवक, जनतेचा पाईक वगैरे उपाध्या लावून मिरवत असतात. पण हिमंत बिस्वा सरमा यांनी लोकांशी कौटुंबिक नातं निर्माण केलं. त्यांनी स्वत:ला मामा म्हणून प्रेझेंट केलं. तसेच मामा म्हणूनच त्यांचं ब्रँडिंग झालं. त्यामागे महिलांचा मोठा हातभार होता.
हिमंत बस्वा सरमा यांनी प्रत्येक घरातील महिलांना समस्यांमधून सोडवण्याचा प्रयत्न केला. ‘अरुणोदयी 2.0’ योजनेसह इतर योजना सुरू केल्या. थेट लाडक्या बहिणी आणि भाच्यांच्या खात्यात त्यांनी रोख रक्कम टाकली. निवडणूक जवळ येताच या योजनांची व्याप्ती वाढवली. पैसेही वाढवले. त्यामुळे त्यांना महिलांनी भरभरून मतदान केलं. तिकडे काँग्रेसने केवळ महागाईचा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा करण्याचा प्रयत्न केला. पण हा मुद्दाही काँग्रेस ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवू शकले नाही. उलट ग्रामीण भागातील महिलांना मामाकडून मिळणारी थेट रोख रक्कम मोठा आर्थिक आधार झाली. या आर्थिक पाठबळामुळेच हिंमत सरमा यांना आसामच्या प्रत्येक घराघरातील सदस्य बनवले. आणि महिलांनीही परतफेड म्हणून आपल्या लाडक्या मामाला भरभरून मतदान करून पुन्हा एकदा सत्तेत बसवलं.
मियांचा हत्यार म्हणून वापर
मामा शब्दामुळे आपलेपण निर्माण झालं होतं. तर दुसरीकडे हिंमत सरमा यांनी मियां पॉलिटिक्सला धक्का देण्याचं काम केलं. मियां हा शब्द त्यांनी हत्यार म्हणून वापरला. आसाममध्ये बांगलादेशींची घुसखोरी हा संवेदनशील मुद्दा आहे. हिंमत सरमा यांनी या मुद्द्यावर नो कॉम्प्रमाईजवाली आपली प्रतिमा तयार केली. त्यांनी प्रत्येक रॅलीतून मिया पॉलिटिक्सवर थेट हल्ला सुरू केला. तसेच मियां पॉलिटिक्स आसामी संस्कृतीसाठी मोठा धोका असल्याचा हल्लाही त्यांनी चढवला.
हिंमत सरमा यांनी सेट केलेला नरेटिव्ह राज्यात खूपच चालला. त्यामुळे स्थानिक लोकांना ते एकत्रित आणू शकले. त्यानंतर त्यांनी मदरसे बंद करण्यापासून लँड जिहादपर्यंतच्या भूमिका आक्रमकपणे घेतल्या. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि हिंदूंना भाजपकडे शिफ्ट करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे काँग्रेस क्लिन बोल्ड झाली. काँग्रेसने सेक्युलरेज्मचा मुद्दा घेताच भाजपकडून मियां तुष्टीकरणाचं लेबल लावून या मुद्द्यातील हवाच काढून घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे विरोधकांच्या मतांच्या बेगमीचं गणितच कोलमडून गेलं.
