Operation Sindoor : अखेर सत्य समोर; ट्रम्प पुन्हा तोंडावर, या देशाच्या विनंतीनंतर भारताने हल्ले थांबवले, पाकच्या उपपंतप्रधानांचा दावा काय

India-Pakistan Tension : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर अचूक निशाणा साधला. दोन्ही देशात तणाव वाढला. आपल्यामुळे दोन्ही देशातील युद्ध थांबल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. पण पाक आणि भारताने तो फेटाळला होता.

Operation Sindoor : अखेर सत्य समोर; ट्रम्प पुन्हा तोंडावर, या देशाच्या विनंतीनंतर भारताने हल्ले थांबवले, पाकच्या उपपंतप्रधानांचा दावा काय
ट्रम्प यांचा दावा फोल
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 20, 2025 | 8:52 AM

Mohammad Ishaq Dar : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला होता. त्यात अनेक दहशतवादी ठार झाले होते. पाकिस्तानने ड्रोन हल्ले केल्यानंतर त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. पाकिस्तानच्या एअरबेसचे मोठे नुकसान झाले. दोन्ही देशांनी अचानक यु्द्ध थांबवण्यावर शिक्कामोर्तब केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून आपल्यामुळे दोन्ही देश युद्धविरामावर राजी झाल्याचा दावा केला. दोन्ही देशांनी हा दावा फेटाळला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॅनाडा दौऱ्यावर असताना त्यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी दोन्ही देशात तिसऱ्या देशाची मध्यस्थी झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्यात आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान इसहाक डार यांनी पहिल्यांदाच हे युद्ध का थांबले याचा मोठा खुलासा केला आहे.

एअरबेसचे मोठे नुकसान

पाकचे उपपंतप्रधान इसहाक डार यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावर हे कबूल केले की, भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत रावळपिंडी येथील नूर खान एअरबेस आणि शोरकोट एअरबेसवर एअरस्ट्राईक केली. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला.

भारताने आम्हाला दिला मोठा धक्का

जिओ न्यूज या वृत्तवाहिनीला डार यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक मुद्यांवर मत मांडले. आतापर्यंत भारताने केलेल्या कारवाईत काहीच नुकसान झाले नाही, उलट पाकिस्ताननेच भारताची दमकोंडी केली. त्यांची फायटर जेट पाडल्याचा दावा केला होता. पण हा कांगावा जास्त दिवस टिकला नाही. भारतीय लष्कराने उपग्रह छायाचित्रासह पाकिस्तानच्या दाव्याची पोलखोल केली होती. आम्ही प्रत्युत्तर देण्याच्या तयारीतच होतो, पण त्यापूर्वीच भारताने हल्ला करून आम्हाला मोठा धक्का दिला, असा कबुलीनामा डार यांनी दिला.

सौदी अरबच्या राजपुत्राने केली मध्यस्थी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशात युद्धविराम घडवून आणल्याचा दावा केला होता. तो उपपंतप्रधान इसहाक डार यांनी खोडून काढला. ट्रम्प यांच्यामुळे नाहीतर सौदी अरबमुळे भारताने हल्ले थांबवल्याचा दावा डार यांनी केला. सौदी अरबचे प्रिंस फैसल बिन सलमान यांनी दोन्ही देशात दूत पाठवले होते. त्यानंतर त्यांनी डार यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशातील तणाव निवळण्याची इच्छा व्यक्ती केली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी डार यांनी चर्चा करावी असे सौदी प्रिन्सने प्रस्ताव ठेवला. तेव्हा डार यांनी सौदी प्रिन्स यांना पाकिस्तान थांबायला तयार असल्याचा निरोप भारताला देण्याची विनंती केली. चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविरामावर सहमती झाली होती.