इराण-अमेरिकेच्या डीलनंतर पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी, आम्ही शांत बसणार नाही, उत्तर देऊ..

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधु जल वाटप कराराला रद्द केले आहे. आता १४ महिन्यानंतर पुन्हा पाकिस्तानने धमक्यांची भाषा सुरु केली आहे. पीपीपी प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी पुन्हा भारताला पोकळ धमकी दिली आहे.

इराण-अमेरिकेच्या डीलनंतर पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी, आम्ही शांत बसणार नाही, उत्तर देऊ..
PPP Chief Bilawal Bhutto Zardari
| Updated on: Jun 19, 2026 | 5:42 PM

सिंधु जल करारावरुन भारतासमोर दयेची भिक मागणारा पाकिस्तान पुन्हा एकदा गरळ ओकू लागला आहे. संयुक्त राष्ट्रात आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रश्न मांडणाऱ्या पाकिस्तानची मागणी फेटाळत भारताने जगासमोर संदेश दिला आहे की रक्त आणि पाणी एकसाथ वाहू शकत नाही असे म्हटले आहे. जर पाकिस्तानला सिंधुनदीचे पाणी हवे तर सीमेपलिकडून दहशतवादाला प्रोत्साहन देणे बंद करावे असे भारताने सुनावले आहे.आता पाकिस्तानचे सगळे रडीचे डाव संपल्याने आता पाकिस्तान पुन्हा आपल्या शिळ्या कढीला उतू देत आहे. आता पुन्हा पाकिस्तानने भारताला धमकी दिली आहे की भारताने पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर इस्लामाबाद याला योग्य उत्तर देण्यासाठी तयार आहे.

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने सिंधु जल करार रद्द केला होता. सुमारे १४ महिन्यानंतर आता पाकिस्तानने धमकी देण्यावर उतरला आहे. शाहबाज शरीफ यांच्या सरकारमध्ये सामील पाकिस्तान पिपल्स पार्टीचे चेअरमन बिलावल भुट्टो झरदारी यांनी म्हटले आहे की इस्लामाबाद यास सहन करणार नाही. पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत भाषण करताना बिलावल भुट्टो यांनी भारतावर पाणी रोखण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘आम्ही नद्यांच्या पाण्यातील आमच्या हक्कांचा वाटा सोडणार नाही. पाकिस्तान आपल्या वाट्याचे पाणी आणि अधिकारासाठी लढेल. पाण्याचा प्रवाह रोखण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला मजबूतीने प्रत्युत्तर दिले जाईल.’

बिलावल भुट्टो यांनी आधीही केली होती टीका

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी सिंधु करारावर पहिल्यांदाच वक्तव्य केलेले नाही. याआधी देखील भुट्टो यांनी सिंधु नदीत रक्ताचे पाट वाहतील अशी आगलाऊ भाषा केली होती. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाल्यानंतर भारताने अनेक प्रकारची पावले उचलली होती. यात सिंधु जल करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. साल १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तानात वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याची वाटणी या करारानुसार करण्यात आली होती. भारताने हा करार रद्द केल्याने पाकिस्तानात पाणी संकट येण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळे इस्लामाबाद संतप्त झाला आहे आणि या युद्धाची सुरुवात असे म्हणत आहे.

पाकिस्तान वारंवार सीमेपलिकडून अतिरेक्यांना रसद पुरवत असून भारतात अशांतता पसरवत आहे. अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यापासून ते फंडींग करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत सिंधुनदी पाणी वाटप करार पुन्हा बहाल केला जाणार नाही असे भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी अनुपमा सिंह यांनी UNSC च्या ६२ व्या सत्रात बोलताना स्पष्ट केले आहे. सिंधु जल करारावरुन (IWT)दिल्ली आपली भूमिका बदलणार नाही असेही भारताने स्पष्ट केले आहे.

 

 

Follow Us