
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने अनेकांची मने जिंकली होती. या चित्रपटाची जगभरात चर्चा सुरु होती. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने तुफान कमाई केली. या चित्रपटात ल्यारीमधील रहमान डकैतची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात एकटा अक्षय खन्ना संजय दत्त, रणवीर सिंह, अर्जुन कपूर आणि आर. माधवन यांच्या भूमिकांवर भारी पडत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रहमान डकैत किती क्रूर होता हे दाखवण्यात आले आहे. एकदा तर रहमानने दाऊद इब्राहिमला देखील धमकी दिली होती. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया…
रहमान डकैतचा खौफ
रहमान डकैतने दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ नूरा (नूर उल हक उर्फ नूरा)चे प्रथम अपहरण केले आणि नंतर क्रूरपणे मारले. रहमानने नूराला अतिशय वेदनात्मक मृत्यू दिला. ही माहिती सोशल मीडियावर क्रिटिक सिद्धार्थ अरोरा ‘सहर’ यांनी व्हायरल पोस्टमध्ये उघड केली आहे. एका व्हायरल पोस्टनुसार, २००९ मध्ये एका बिझनेसमॅनला एका डॉनचा फोन आला. डॉन त्या बिझनेसमॅनकडून एक खास जमीन घेऊ इच्छित होता, त्याबदल्यात १२ कोटी रुपये देण्याची ऑफर दिली. पण बिझनेसमॅनच्या जमिनीची किंमत ४०० कोटी रुपये सांगितली. यानंतर डॉनने धमकी दिली की, “१२ कोटी घेऊन जा, नाहीतर ना जमीन राहील ना १२ कोटी.”
रहमान डकैतचा काय संबंध?
हा बिझनेसमॅन रहमान बलोच (रहमान डकैत) चा नातेवाईक निघाला. जेव्हा त्याने रहमानला ही हकीकत सांगितली, तेव्हा रहमानने ताबडतोब धमकी देणाऱ्या व्यक्तीला फोन केला आणि सांगितले, “या जमिनीवरून नजर काढ, कारण तो माझा नातेवाईक आहे.” पण दाऊदने ऐकले नाही आणि उलट रहमानलाच शिवीगाळ केली. रहमान संतापला आणि त्याने बदला घेण्याचा निर्धार केला. रहमानने त्याच रात्री दाऊदचा भाऊ नूराला अपहरण केले आणि फार्म हाउसमध्ये क्रूर टॉर्चर करून मारले. नूराला ताब्यात घेतल्यानंतर रहमानने दाऊदला फोन केला. फोनवर नूराच्या वेदनात्मक किंकाळ्या ऐकवल्या. तो नूराला सिगारेटचे चटके देत होता आणि फोनवर बोलायला लावत होता. हे ऐकून डॉन जमीन सोडण्यास तयार झाला आणि भावाच्या जीवासाठी भीक मागू लागला. पण रहमानने नूराला मारून टाकले.
धुरंधर चित्रपटाविषयी
धुरंधर या चित्रपटात देखील रहमान डकैत प्रचंड क्रूर दाखवला आहे. त्याने अनेकांना अत्यंत वाईट मृत्यू दिला. पण चित्रपटाच्या शेवटी रहमान डकैतचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. आता या चित्रपटाच्या पुढच्या भागात म्हणेजच ‘धुरंधर 2’ काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.