Mohan Bhagwat : ‘हिंदू जागा झाल्यास जग जागे होईल’; मोहन भागवत यांचं कॅनडात महत्वाचं विधान
मोहन भागवत यांनी कॅनडात महत्वाचं विधान केलं. 'हिंदू जागा झाल्यास जग जागे होईल, असे विधान भागवत यांनी केलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या एकजुटीवर महत्त्वाचं भाष्य केलं. भारत मानवतेसाठी किती योगदान देतो, यावरून देशाची प्रगती मोजली पाहिजे, असे भागवत यांन म्हटलं. यावेळी त्यांनी भारताची विविधता आणि जागतिक मैत्रीवरही भाष्य केलं. ते कॅनडाच्या टोरंटोमध्ये बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या कॅनडाच्या टोरंटो दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोहन भागवत यांनी हिंदुत्वावर मोठं विधान केलं. यावेळी भागवत यांनी भारताने जगाची सेवा केल्याचे अधोरेखित केलं. भागवत म्हणाले, हिंदू जागे झाल्यावर जग जागे होईल. भारताचा ‘डीएनए’ हा इतरांना मदतीचा हात पुढे करण्याचा आहे. भारताला एकेकाळी महासत्ता म्हणता आले असते, परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. भारताने जगाची सेवा केली. भारतात मतभेदांना अडथळे मानले जात नाहीत. भारताची परंपरा ही लोकांना विविधतेत एकता शिकवते. संपूर्ण जग एक कुटुंब आहे, अशी भारतीयांची भावना असल्याचे म्हणत ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचा अर्थ सांगितला.
