India-Pakistan Disupte : भारतासोबत मध्यस्थी घडवून आणण्याच्या प्रश्नावर रशियाची भूमिका जाहीर, पाकिस्तानसाठी धक्कादायक बाब
India-Pakistan Disupte : पाकिस्तान, भारत आणि अफगाणिस्तानच्या संबंधातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थ म्हणून रशियाची भूमिका काय आहे? या प्रश्नावर रशियन परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिलं आहे. अलीकडे पाकिस्तान सुद्धा रशियासोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतोय.

दहशतवादाचा आश्रयदाता असलेल्या पाकिस्तानला आता रशियाकडून अपमानित व्हावं लागलं आहे. भारत-पाकिस्तानमधीस वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मध्यस्थी करणार नाही हे रशियाने स्पष्ट केलय. “दोन्ही देशांनी द्विपक्षीय मार्गाने या वादात तोडगा काढावा. रशिया त्याचवेळी मदत करेल, जेव्हा कुठला देश विशेषरित्या विनंती करेल” असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. रशियाची ही भूमिका कूटनितीक दृष्टीकोनातून भारतासाठी अनुकूल मानली जात आहे. पाकिस्तानसाठी हा कठोर संदेश आहे. चर्चेच्या माध्यमातून या तणावावर मार्ग काढा. मदतीसाठी दुसऱ्या देशाच्या उंबरठ्यावर जाऊ नका.
पाकिस्तान, भारत आणि अफगाणिस्तानच्या संबंधातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थ म्हणून रशियाची भूमिका काय आहे? या प्रश्नाच्या उत्तरात रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलय की, “रशिया मध्यस्थ म्हणून काम करत नाही. जर या देशांनी विनंती केली, तर आम्ही त्यांच्यातील मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी शक्य ती सर्व मदत करायला तयार आहोत”
रशिया-पाकिस्तानात किती बैठका?
इस्लामाबादने 1972 च्या सिमला आणि 1999 सालच्या लाहोर घोषणापत्रानुसार द्विपक्षीय समस्या सोडवल्या पाहिजेत, असं मॉस्कोचं मत आहे. 2025 साली रशिया आणि पाकिस्तानात अनेक स्तरावर द्विपक्षीय बैठका झाल्या. यात चीनमध्ये आयोजित SCO शिखर सम्मेलनात राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यात एक बैठक झाली होती.
कुठे पार्टनरशिप होईल?
2030 पर्यंत रशिया आणि पाकिस्तानमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या विकासासाठी एका कार्यक्रमाला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. पाकिस्तानात तेल आणि गॅस प्रकल्पात रशियन कंपन्यांची भागीदारी होऊ शकते. तातारस्तान गणराज्य आणि प्रिमोर्स्कीसह अनेक रशियन क्षेत्रांनी पाकिस्तानी प्रांतासोबत प्रत्यक्ष सहकार्य विकसित करण्यात इंटरेस्टेड आहे.
रशिया पाकिस्तानपासून हात राखूनच
रशिया हा भारताचा सर्वात जवळचा मित्र आहे. रशिया आतापर्यंत कठीण प्रसंगात भारतासोबत उभा राहिला आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताने रशियन शस्त्रांच्या मदतीनेच पाकिस्तानला धडा शिकवला होता. पाकिस्तान वारंवार रशियाच्या निकट जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण रशिया पाकिस्तानपासून हात राखूनच आहे.
