आम्हाला वाचवा, रशियात अडकलेल्या भारतीयांची आर्त हाक, धडकी भरवणारी माहिती समोर
शियन सैन्यात फसवणुकीने भरती झालेल्या ३२ भारतीयांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या भीषण परिस्थितीत अडकलेल्या उर्वरित ३५ भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु आहेत.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाला चार वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. या भीषण युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता रशियातील सैन्यात सहभागी असलेल्या भारतीय नागरिकांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युक्रेनविरुद्ध लढताना आतापर्यंत ३२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या रशियन सैन्यात अडकलेल्या उर्वरित ३५ भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे.
रशियन सशस्त्र दलात भारतीयांची झालेली ही भरती सध्या नवी दिल्ली आणि मॉस्को यांच्यातील राजनैतिक संबंधांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. अनेक भारतीयांना एजंटांमार्फत फसवून रशियात नेले जात असल्याचे समोर आले आहे. आकर्षक पगार, भरघोस बोनस आणि रशियन नागरिकत्वाचे आमिष दाखवून तरुणांना रशियन सैन्यात भरती केले जात आहे. विशेष म्हणजे, ज्यांना सफाई कामगार, प्लंबर किंवा बांधकाम मजूर म्हणून नेले होते, त्यांनाही जबरदस्तीने युद्धभूमीवर ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी डिसेंबर २०२५ मध्ये संसदेत याबद्दलची माहिती दिली होती. त्यावेळी मृतांचा आकडा २६ होता. मात्र, ताज्या आकडेवारीनुसार हा आकडा आता ३२ वर पोहोचला आहे. तसेच, बेपत्ता भारतीयांची संख्या ७ वरून १२ झाली आहे. रशियन सैन्यात एकूण २१४ भारतीयांची भरती करण्यात आली होती. त्यापैकी १३५ जणांना सुखरूप भारतात आणण्यात यश आले आहे.
भारतीयांचे मृतदेह भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू
गेल्या काही महिन्यांपासून युद्धात प्राण गमावलेल्या भारतीयांचे मृतदेह भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. जम्मूच्या अखनूरमधील २४ वर्षीय सचिन खजुरिया याला युद्धात मरण आले. त्यांचा मृतदेह नुकताच त्यांच्या गावी आणण्यात आला. तर आर.एस. पुरा येथील मनजिंदर सिंग यांचा मृतदेह फेब्रुवारीमध्ये त्यांच्या घरी पोहोचला. हरियाणाच्या कैथलचा २१ वर्षाचा गीतिक शर्मा मार्च २०२५ मध्ये कामासाठी रशियाला गेला होता, त्यांचा मृतदेह मार्च २०२६ मध्ये मायदेशी आणला गेला.
भारत सरकारची भूमिका
दरम्यान रशियातील भारतीय कामगारांची संख्या सध्या सुमारे १ लाखांच्या घरात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर रशियन सैन्यात अडकलेल्या उर्वरित ३५ भारतीयांना तातडीने कार्यमुक्त करून त्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालय रशियन प्रशासनाशी सतत संपर्कात आहे. यामुळे रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे.
